बीड, लोकशाही न्यूज नेटवर्क
आज बीडमध्ये कार्यकर्ता मेळावा पार पडला असून राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री अजित पवार आज बीडच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे चर्चेला उधाण आले आहे.
यावेळी अजित पवार म्हणाले की, शाली आणू नका. हारतुरे आणू नका. मला टोप्या घालू नका. येऊन नुसता मला नमस्कार करा. तो मला प्रेमाचा वाटेल. कारण, जेवढा मोठा हार, तेवढी मला भिती वाटते. आयला काहीतरी कुठेतरी याने मारली… काय मारली ते बघा तुम्ही आणि तो हाराचा बोजा आहे आपल्या मानगुटीवर… स्मृतीचिन्ह काही देऊ नका. कर्म धर्म संयोगाने… आई-बापाच्या कृपेने… चुलत्याच्या कृपेने बरंच चांगलं चाललंय. आमचं. काही देऊ नका… फक्त प्रेम द्या… माझा नमस्कार घ्या, तुमचा नमस्कार द्या…. पायाही पडू नका. मी जाहीरपणे सांगतो, आजचे पुढारी पाया पडण्याच्या लायकीचे नाहीत. ज्याच्या पाया पडता, त्याची हिस्ट्री आठवा… नंतर अरे मी कुणाच्या पाया पडलो असा प्रश्न पडेल. आई-बापाच्या पाया पडा. गुरुंच्या पाया पडा. मला जो गुरु म्हणून शिकवतो त्यांच्या पाया पडा. पूर्वी यशवंतराव चव्हाण, वसंतदादा, वसंतराव नाईक आदी मोठी माणसे होऊन गेली. ही लोकं आभाळाएवढी मोठी माणसे होती. त्यांच्यापुढे नतमस्तक व्हा, असंही अजित पवार म्हणाले.
कुठंतरी मागे झालेल्या चुका आता टाळल्या पाहिजेत. आता आपल्याला नवीन पिढीसाठी काहीतरी केले पाहिजे. तुम्ही थोडं दम धरा, मी काय करतो ते बघा. बीडमध्ये अनेक गोष्टी करण्याचा माझा प्रयत्न आहे. एकदा डोक्यातील जातीचं खूळ काढून टाका. सगळी हाडामासांची माणसं आहेत, सगळ्यांचं रक्त लालच आहे. परंतु मी इथलं राजकारण गेली अनेक वर्षे बघतोय, जातीच्या मुद्द्यावरुन समाजात फूट पाडायची आणि आपली राजकीय पोळी भाजायची, हे सुरु आहे. इतक्या वर्षांमध्ये बीडला किती मंत्रीपदं आणि पदं मिळाली, पण विकास काय झाला, याचा विचार केला पाहिजे. मी महापुरुषांच्या पुतळ्यासंदर्भात पोलीस अधिकाऱ्यांशी बोललो आहे. कुठल्याही महापुरुषांविषयी माझ्या मनात श्रद्धेची, मानाची आणि आदराची भावना आहे, असे अजित पवार यांनी सांगितले.