उपमुख्यमंत्री अजित पवारांनी प्रोटोकॉल पाळला नाही..!

0

 

लोकशाही न्यूज नेटवर्क 

जळगाव जिल्ह्यातील दोन माजी मंत्री, तीन माजी आमदारांसह अनेकांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला जणू खिंडार पडली आहे. माजी मंत्री गुलाबराव देवकर, माजी मंत्री डॉक्टर सतीश पाटील आणि माजी आमदार पाचोर्‍याचे दिलीप वाघ यांनी २०२४ च्या निवडणुकीत महायुतीतील शिवसेनेचे उमेदवार यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती आणि त्यात त्यांचा दारुण पराभव झाला होता. त्यानंतर ही मंडळी भाजपमध्ये प्रवेश करत असल्याची चर्चा सुरू झाली होती. तथापि या सर्वांनी सत्ताधारी महायुतीतील अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शनिवार दिनांक 3 मे रोजी प्रवेश केला. त्यानंतर सत्ताधारी महायुतीतील भाजपचे मंत्री गिरीश महाजन तसेच पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी महायुतीचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या नेत्यांना पक्षात प्रवेश देताना प्रोटोकॉल पाळला नाही, म्हणून माध्यमांशी प्रतिक्रिया देताना खंत व्यक्त केली. त्यामुळे महायुतीमध्ये अजित पवारांच्या विरोधात या पक्षप्रवेशावरून धुसफुस सुरू झाली आहे.

पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, माजी मंत्री गुलाबराव देवकरांना राष्ट्रवादीमध्ये प्रवेश देताना किमान उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याशी बोलणे आवश्यक होते. कारण गुलाबराव देवकरांनी स्वतः गुलाबराव पाटलांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. अजित पवारांनी महायुतीचा धर्म पाळायला हवा होता, परंतु त्यांनी तो पाळला नाही. प्रत्येकाला आपला पक्ष वाढविण्याचा अधिकार आहे. परंतु यापुढे आम्ही सुद्धा त्यांच्या लोकांना आमच्या पक्षात घेण्यास तयार असू, इतकेच नव्हे तर ज्या गुलाबराव देवकरांनी राष्ट्रवादी सत्ताधारी पक्षात प्रवेश केला आहे. तो म्हणजे स्वतःचा भ्रष्टाचार लपविण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, असा आरोप गुलाबराव पाटलांनी केला. तसेच निवडणूक कालावधीत जिल्हा बँकेकडून दहा कोटी रुपये उचलले असून हे प्रकरण निवडणूक आयोगाकडे प्रलंबित आहे. तसेच याच कालावधीत मजूर सहकारी फेडरेशन मधून दहा कोटी रुपये घेतले आहेत. इतकेच नव्हे तर मजूर सहकारी फेडरेशनला अख्खे धुवून काढून भ्रष्टाचार केला आहे. कोर्टात हे प्रकरण चालू आहे.

त्याचबरोबर गुलाबराव देवकर आपल्या मेडिकल कॉलेजसाठी शासनाकडून २७ लाख रुपये भाडे घेतात. हे कुठल्या नियमाअंतर्गत घेतात? हे सर्व प्रकरण झाकण्यासाठी त्यांनी अजित पवारांच्या पक्षात प्रवेश केला आहे. तथापि त्यांच्या विरोधात मी आवाज उठवल्या शिवाय राहणार नाही, असा इशारा सुद्धा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिला. एकंदरीत अजित पवारांनी स्वतःच्या राष्ट्रवादी पक्षातच जिल्ह्यातील या नेत्यांना प्रवेश देऊन प्रोटोकॉल पाळला नाही, असे म्हणत गिरीश महाजन आणि गुलाबराव पाटलांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील महायुतीतील सत्ताधारी पक्षात या प्रवेशांवरून धुसफूस सुरू झाली आहे. भाजपमध्ये कोणालाही प्रवेश द्यायचा असेल तर कस लावूनच आम्ही प्रवेश देतो, असेही गिरीश महाजन यांनी स्पष्ट केले.

जळगाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश झाल्यानंतर सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेत खळबळ माजली आहे. तीन पक्षाच्या महायुतीतील सत्ताधारी पक्षात प्रत्येकाला आपला पक्ष वाढविण्याचा अधिकार आहे. त्यानुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद वाढविण्यासाठी ते कुणालाही त्यांच्या पक्षात प्रवेश देऊ शकतात. तीच बाब भाजप तसेच एकनाथ शिंदे यांची शिवसेना अमलात आणतील यात शंका नाही. तसेच झाले तर महायुतीतील या तिन्ही पक्षात धुसफुस राहील. आधीच महायुतीची सत्ता स्थापन झाली तेव्हापासून एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि भाजप यांच्यात सातत्याने वाद होत आहेत. या उपर अजित पवार आणि भाजप यांच्यात चांगलेच सख्य असल्याचे चित्र दिसून येते.

अनेक वेळा सत्तेतून बाहेर पडण्याचा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून इशारा दिला गेला आहे. परंतु सत्तेतून बाहेर पडण्याचा मूर्खपणा एकनाथ शिंदे करणार नाहीत. पक्षात राहूनच त्रास देण्याचा प्रयत्न करतील. एकनाथ शिंदे आणि केंद्रीय गृहमंत्री अजित अमित शहा यांच्या वारंवार भेटी घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात तक्रारी करीत असतात. परंतु काही झाले तरी अमित शहा हे एकनाथ शिंदे यांना दाद देत नाहीत. म्हणून महायुतीतील तिन्ही पक्षात सर्व काही अल्बेल नाही, हे स्पष्ट होते. त्यातच जळगाव जिल्ह्यातील अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस मधील प्रवेशामुळे मात्र जळगाव जिल्ह्यात धुसफुस वाढली आहे. त्यामुळेच अजित पवारांनी प्रोटोकॉल पाळला नाही, अशी ओरड होत आहे..!

Leave A Reply

Your email address will not be published.