लोकशाही न्यूज नेटवर्क
मुंबई ;राज्य सरकार यापुढे सहकारी किंवा खासगी साखर कारखान्यांना हमी देणार नाही. यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधान परिषदेत माेठी घोषणा केली.
विरोधकांनी केलेल्या आरोपांवर उत्तर देताना अजित पवार म्हणाले की, राज्य सरकार यापुढे सहकारी किंवा खासगी साखर कारखान्यांना हमी देणार नाही. आम्ही साखर कारखान्यांमध्ये कोणताही भेदभाव करीत नाही. हिरे व्यापारी नीरव मोदी, उद्योगपती विजय मल्ला यांनी काही बँकांना बुडवले. दोघेही विदेशात पळाले आहेत. मात्र राज्यातील राज्य सहकारी बँकांची अवस्था भक्कम आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.
जिल्हा बँका कोणत्या पक्षाच्या हातात आहेत हे पाहू नका, जर कोणी चुकीचे काम केले तर तो स्वपक्षातील असो की विरोधी पक्षातील संबंधितांवर कारवाई करा, असे मी स्वत: सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी सांगितले आहे, असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले. ज्या जिल्हा बँकेवर प्रशासक आहे येथील परिस्थिती सुधारत आहे. यामुळे सध्या तरी येथील निवडणूक घेतली जाणार नाही, असेही त्यांनी सांगितले.