पोंभूर्णा, लोकशाही न्यूज नेटवर्क

केंद्र शासनाच्या “कापूस उत्पादकता वाढ (कपास क्रांती) अभियान २०२६-२७”, राष्ट्रीय अन्न सुरक्षा व पोषण अभियान तसेच राष्ट्रीय खाद्यतेल अभियान (तेलबिया) अंतर्गत पोंभूर्णा तालुक्यात धान, कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी विविध गावांमध्ये कृषी प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वीरित्या आयोजित करण्यात आला.
कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे उत्पादन व उत्पादकता वाढविण्याच्या उद्देशाने देवई, भिमनी आणि चेक खापरी येथे प्रशिक्षण घेण्यात आले. धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी भिमनी, बोर्डा बोरकर आणि सातारा भोसले येथे, तर सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी चक आष्टा येथे विशेष प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

प्रशिक्षणादरम्यान कृषी तज्ज्ञांनी कापूस, धान व सोयाबीन पिकांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन, संतुलित खत व्यवस्थापन, कार्यक्षम पाणी व्यवस्थापन, तण नियंत्रण, रासायनिक घटकांचा कमी वापर करून सेंद्रिय घटकांचा अधिकाधिक समावेश तसेच लागवडीपासून काढणीपर्यंतच्या शास्त्रशुद्ध पीक व्यवस्थापनाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करून उत्पादन खर्च कमी करत दर्जेदार व अधिक उत्पादन घेण्याचे आवाहन शेतकऱ्यांना करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुका कृषी अधिकारी स्वाती ढोबळे होत्या. त्यांनी तालुक्यातील शेतकऱ्यांना अद्ययावत कृषी तंत्रज्ञान, शास्त्रशुद्ध पीक व्यवस्थापन आणि उत्पादनवाढीसाठी आवश्यक मार्गदर्शन सातत्याने उपलब्ध करून दिले जात असल्याचे सांगितले.
यावेळी मंडळ कृषी अधिकारी गणेश गवळी यांनी कपास क्रांती अभियान, राष्ट्रीय अन्न सुरक्षा व पोषण अभियान तसेच राष्ट्रीय खाद्यतेल अभियान (तेलबिया) यांच्या उद्दिष्टांची माहिती देत विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याचे आवाहन केले.
या प्रशिक्षण कार्यक्रमास कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी, ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, प्रगतशील शेतकरी तसेच परिसरातील मोठ्या संख्येने धान, कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकरी उपस्थित होते. प्रशिक्षणाद्वारे शेतकऱ्यांना शाश्वत, आधुनिक व शास्त्रशुद्ध शेती पद्धतींचा अवलंब करून उत्पादन व उत्पादकता वाढविण्यासाठी उपयुक्त मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाची सांगता उत्साहपूर्ण वातावरणात झाली.


