
लोकशाही न्यूज नेटवर्क
शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याने बळीराजा पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील एका शेतकऱ्याला कांद्याच्या घसरलेल्या दराचा मोठा फटका बसला असून, ७३ पोती कांदा विकल्यानंतर सर्व खर्च वजा जाता त्यांच्या हातात केवळ ४०० रुपये उरले आहेत. यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, करमाळा तालुक्यातील पांगरे येथील शेतकरी अंकुश अण्णा गुंजाळ यांनी आपल्या शेतात मोठ्या कष्टाने कांद्याचे पीक घेतले होते. २१ एप्रिल २०२६ रोजी त्यांनी आपला ७३ पोती कांदा विक्रीसाठी सोलापूर येथील ‘शरीफ ट्रेडर्स’ या आडत दुकानावर आणला होता. मात्र, बाजारपेठेत कांद्याची आवक वाढल्याने त्यांच्या कांद्याला प्रति किलो केवळ ५० पैसे इतका नीचांकी भाव मिळाला. कांदा विक्रीची ‘पट्टी’ हातात आल्यानंतर शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी आले. ७३ पिशव्या कांद्याची एकूण विक्री किंमत ५,०६८ रुपये झाली. मात्र, त्यातून खालील खर्च वजा करण्यात आले.
वाहतूक भाडे, हमाली व तोलाई,आडत खर्च हे सर्व खर्च वजा जाता, अंकुश गुंजाळ यांना प्रत्यक्षात फक्त ४०० रुपये मिळाले. दिवसभर उन्हात राबून आणि हजारो रुपये खर्च करून पीक घेतल्यानंतर हातात आलेल्या या तुटपुंज्या रकमेमुळे शेती करायची कशी, असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे.
शेतकऱ्याने रात्रंदिवस कष्ट करून पीक पिकवायचे आणि बाजारात आल्यावर त्याला मातीमोल भाव मिळायचा, हे दुर्दैव आहे. सरकारने तातडीने लक्ष देऊन प्रत्येक पिकाला हमीभाव द्यावा, तरच शेतकरी जगू शकेल. या घटनेमुळे करमाळा परिसरात हळहळ व्यक्त होत असून, कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी विशेष मदतीची मागणी जोर धरत आहे.

