लोकशाही न्यूज नेटवर्क

एका भीषण अपघातात तीन मुलांसह एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाल्याची घटना झारखंडमध्ये घडली. अघारामाजवळ भरधाव वेगात असणारी स्कॉर्पिओ थेट झाडावर जाऊन आदळल्यामुळे अपघात झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. या अपघातात ५ जणांचा जागेवरच मृत्यू झाला, तर ४ जण जखमी आहेत. जखमींना जवळच्या रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती स्थानिक मीडियाने दिली आहे.
एकाच कुटुंबातील पाच जणांच्या मृत्यूमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. मृतांमध्ये लोहरदगा येथील ५८ वर्षीय गुलाम मुस्तफा, त्यांची पत्नी ५५ वर्षीय गुलशन परवीन आणि तीन मुलांचा समावेश आहे. अपघातात कुटुंबातील इतर सदस्य जखमी झाले आहेत. त्यांना रिम्समध्ये दाखल करण्यात आले आहे. अपघातात मृत्यू झालेल्या ५ जणांचे मृतदेह पोस्टमार्टमसाठी रूग्णालयात पाठवण्यात आले आहेत. पोलिसांनी अपघाताची नोंद केली असून पुढील तपास करण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुलाम मुस्तफा आपल्या कुटुंबासोबत लसिया गावाला जात होते. त्यावेळी अघारामाजवळ त्यांची स्कॉर्पिओ गाडी नियंत्रणाबाहेर जाऊन रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला धडकली. ही धडक इतकी जोरदार होती की गाडीचा चक्काचूर झाला आणि पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात हिना परवीन, नेहा परवीन, उमर नवाज हा मुलगा आणि चालक अक्रम खलिफा हे जखमी झाले आहेत. त्यांना रांची येथील रिम्समध्ये दाखल करण्यात आले आहे. या भीषण अपघातामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
अपघाताची बातमी मिळताच रुग्णालयाबाहेर लोकांची गर्दी जमली. कोलेबिराचे आमदार नमन विक्सल कोंगारी, सिमडेगाचे आमदार भूषण बडा आणि इतर लोकप्रतिनिधींनी तीव्र शोक व्यक्त केला. मुस्लिम समाजाचे प्रतिनिधीही पीडितेच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी रुग्णालयात पोहोचले. त्यांना सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले.


