रेल्वेखाली आल्याने प्रौढाचा मृत्यू; मृत व्यक्तीची ओळख पटली
जळगाव | लोकशाही न्यूज नेटवर्क – जळगाव शहरातील असोदा रेल्वे उड्डाण पुलाखाली धावत्या रेल्वेखाली आल्याने एका प्रौढाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी रात्री उघडकीस आली. सुरुवातीला मयताची ओळख न पटल्याने शनिपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र बुधवारी (२४ सप्टेंबर) सकाळी मृत व्यक्तीची ओळख ज्ञानेश्वर सुदाम पाटील (वय ५५, रा. वाल्मीक नगर, जळगाव) अशी पटली.

ज्ञानेश्वर पाटील हे वाल्मीक नगरात पत्नी आणि दोन मुलांसोबत वास्तव्यास होते. रिक्षा चालवणे आणि खाजगी कंपनीत काम करून आपला उदरनिर्वाह करत असलेल्या पाटील हे सोमवारी रात्री कोणालाही न सांगता घरातून निघून गेले होते. त्यानंतर काही वेळातच रात्री सुमारे १० वाजेच्या सुमारास रेल्वेखाली आलेल्या अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता.
ओळख पटली
शवविच्छेदनासाठी मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आला. दरम्यान बुधवारी सकाळी ७ वाजता नातेवाईकांनी ज्ञानेश्वर पाटील असल्याची ओळख पटवली. सकाळी ११ वाजता शवविच्छेदन पूर्ण करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
या घटनेबाबत शनिपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.


