भंडारा, लोकशाही न्यूज नेटवर्क:
लग्न म्हटलं कि, आयुष्यातील सर्वात मोठा क्षण असतो. त्यामुळे तो आयुष्यभर स्मरणात राहावा यासाठी सध्याची पिढी प्रयत्नशील असते. मग त्यासाठी प्री-वेडिंग असो, कि डेस्टीनेशन वेडिंग या ना ना प्रकाराने लग्न हे अधिक खर्चिक बाब होऊन गेलीये. आणि याविषयीचे अनेक किस्से हटके गोष्टी सोशल मीडियावर ऐकायला मिळत असतात. मात्र सध्या भंडारा जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यात एक हटके विवाह सोहळा पार पडला. ज्याची चर्चा सर्वत्र होत आहे. या आदर्श विवाह सोहळ्याचं सर्वत्र कौतुक होत आहे. इतर लग्नांप्रमाणे ना डान्स, ना डीजे अगदी शांततेत लग्न होवूनही या लग्नाने सर्वांचेच लक्ष वेधले आहे.
या विवाह सोहळ्याचं पून्हा एक खास आकर्षण म्हणजे डॉ.बाबासाहेबांनी व्ही.एस.कर्डकांना आदर्श बौध्द विवाह समारंभ कसा असावा, यासंदर्भात ४ डिसेंबर १९५६ मध्ये पत्र लिहीले होते. त्याच पत्राला उद्देशून या आदर्श विवाह सोहळ्याचं आयोजन केले होते.
याबाबत अधिक माहिती अशी की, लाखनी तालुक्याच्या पोहरा गावातील तरूणी प्रांजल धनराज बडोलेचा विवाह अमरावती जिल्ह्यातील पंकज धनराज पाटील यांच्याशी जुळला. दोघेही नवरा नवरी पत्रकार आहेत. विचाराने प्रगल्भ असलेल्या या नवविवाहीत दाम्पत्यानं भारतीय संविधानाला साक्ष मानून आदर्श विवाह पार पाडण्याचा विचार केला.
हा विचार त्यांनी त्यांच्या लग्न सोहळ्यात अमलातही आणला. नवरीने विवाह समारंभात चक्क भारतीय संविधानाचा ग्रंथ हातात घेऊन वाजत गाजत खास एन्ट्री केल्याने उपस्थित पाहुण्या मंडळीचं मनं जिंकून घेतले. त्यानंतर तथागत गौतम बुध्द आणि भारतत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला वंदन करून विवाह सोहळ्याला सुरूवात केली. त्यानंतर भारतीय संविधानाला साक्ष मानून स्वातंत्र, समता, आणि बंधूता ही सांविधानिक तत्वप्रणालीचा अंगीकार करत सध्द्म्मात जिवन जगण्याचा संकल्प देखील केला.