चतुर्विध महोत्सवाची उत्साहात सांगता : धर्म रक्षणाचा संतांनी दिला संदेश

धानोरा, ता. चोपडा : चतुर्विध महोत्सवाच्या निमित्ताने येथे आयोजित संत संमेलनाने धार्मिक, आध्यात्मिक आणि सामाजिक समरसतेचा अद्वितीय संगम घडवून आणला. दोन जगद्गुरू, विविध पंथांचे प्रमुख संत आणि देशभरातील शेकडो महंतांच्या उपस्थितीमुळे हा सोहळा ऐतिहासिक ठरला. या भव्य कार्यक्रमामुळे धानोरा आता केवळ गाव राहिले नसून श्रीक्षेत्र म्हणून ओळख निर्माण करत आहे, अशा भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केल्या.
सोहळ्याची सुरुवात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. समता, बंधुता आणि सामाजिक न्यायाचा संदेश देणाऱ्या या पूजनाने कार्यक्रमाची दिशा स्पष्ट झाली. त्यानंतर पारंपरिक ढोल-ताशे, लेझीम आणि विविध वाद्यांच्या गजरात तसेच मंत्रोच्चारांच्या पवित्र निनादात मिरवणूक काढण्यात आली. गावात गावरानी तुपाची धार फिरवून गावाची शुद्धी करण्यात आली, ज्यामुळे आध्यात्मिक ऊर्जा आणि सकारात्मकतेचा प्रसार झाल्याची भावना व्यक्त करण्यात आली. या कार्यक्रमाचे सर्वात वैशिष्ट्यपूर्ण आकर्षण म्हणजे सर्व संतांना एकाच व्यासपीठावर समान सन्मानाने स्थान देण्यात आले होते. समाजातील भेदाभेद दूर करून एकतेचा संदेश देण्याचा हा प्रयत्न उपस्थितांच्या मनाला भिडला. महामंडलेश्वर जनार्दन महाराज यांनी सांगितले की, आजचा सोहळा केवळ धार्मिक नाही, तर सामाजिक परिवर्तनाची दिशा दाखवणारा आहे. हा सन्मान एखाद्या व्यक्तीचा नसून संपूर्ण संत परंपरेचा आहे. समाजातील सर्व घटकांनी एकत्र येऊन पंचक्रोशीच्या प्रगतीसाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. जगद्गुरू ज्ञानेश्वर देवाचार्य महाराज यांनी समरसतेचा गाभा स्पष्ट करताना सांगितले की, समाजात मतभिन्नता असू शकते, परंतु मनभिन्नता नसावी. जातीपातींच्या भिंती तोडून आपण सर्वांनी एकात्मतेने जगले पाहिजे. समरसतेची सुरुवात प्रत्येकाच्या घरापासून झाली पाहिजे. त्यांनी हिंदू समाज एकत्रित करण्याचा निर्धार व्यक्त करत प्रत्येक घरापर्यंत धर्मध्वज पोहोचवण्याचा संकल्पही यावेळी मांडला.
शिवपंथाचे कालूसिंगजी महाराज यांनी आपल्या मार्गदर्शनात व्यसनमुक्तीचा मुद्दा ठळकपणे मांडला. धर्म ही केवळ पूजा-अर्चेपुरती मर्यादित गोष्ट नाही, तर ती जीवनशैली आहे. व्यसनाधीनता समाजाला कमकुवत करते. श्रद्धा, नियम आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांच्या बळावर सव्वा महिन्यात व्यसनमुक्ती शक्य आहे, असे त्यांनी ठामपणे सांगितले. व्यसनमुक्त समाज निर्माण केल्याशिवाय धर्मरक्षण शक्य नाही, असा संदेश त्यांनी दिला.
या सोहळ्यासाठी कानाकोपऱ्यातून हजारो भाविक धानोरा येथे दाखल झाले होते. मोठ्या संख्येने महिलांची उपस्थितीही विशेष लक्षवेधी ठरली. जगद्गुरू रामराजेश्वर महाराज, स्वामी भारतानंद, सुमती माता, दिव्यानंद महाराज यांच्यासह अनेक संत-महंतांनी समाजप्रबोधनपर विचार मांडले. हम सब एक है या घोषणांनी संपूर्ण मंडप दुमदुमून गेला आणि एकात्मतेची भावना अधिक दृढ झाली. सुत्रसंचालन देविदास महाजन आणि रत्नपारखी महाराज यांनी तर आभार अमोल महाजन यांनी मानले. नियोजनबद्ध आयोजन, शिस्तबद्ध व्यवस्थापन आणि भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे हा सोहळा अत्यंत यशस्वी ठरला.
धानोरा येथे पार पडलेल्या या ‘समरसता’ सोहळ्यामुळे उत्तर महाराष्ट्रात धार्मिक जागृतीसोबत सामाजिक परिवर्तनाची नवी लाट निर्माण होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. संतांच्या संदेशातून समाजात एकोपा, नैतिकता आणि सकारात्मकतेची बीजे पेरली जात असून, भविष्यात अधिक संघटित आणि समरस समाज घडण्याची आशा व्यक्त केली जात आहे.
स्थानिक आमदारांबद्दल नाराजी
धानोरा येथे संत संमेलनासारखा अद्वितीय कार्यक्रम आयोजित असतांनाही स्थानिक आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी पाठ फिरविल्याने अनेकांनी उघड नाराजी व्यक्त केली. या सोहळ्याला मंत्री, आमदार, लोकप्रतिनिधी यांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थिती लावली मात्र स्थानिक आमदार श्री. सोनवणे हे उपस्थित न राहिल्यामुळे सर्वत्र नाराजी दिसून आली.

