खामगाव (गणेश भेरडे) ः केंद्र सरकारने 18 ते 44 वयोगटासाठीचा लसीकरणाचा तिसरा टप्पा 1 मे पासून सुरू करण्याची घोषणा केल्यानंतर सर्वत्र लसीकरणाविषयी चर्चा सुरू झाली होती. राज्यातल्या तरूण वर्गानेे लसीकरणाची तयारी देखील केली होती. मात्र, राज्यात या वर्गासाठी 1 मे पासून लसीकरण सुरूच होणार नसल्याचे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज जाहीर केले आहे.
आज बुधवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये झालेल्या चर्चेवरून सदर बातमी वृत्तसंस्थेच्या माध्यमातून प्रकाशित झाली आहे. मात्र स्थानिक पातळीवर सामान्य रूग्णालयातील भाजपाचे रूग्णकल्याण समितीच्या सदस्यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या जाहिरातीवरून 1 मेलाचं कोरोना लसीकरण सुरू होणार असल्याचे सांगितले आहे. दरम्यान आज मुंबई येथे झालेल्या मंत्री मंडळाच्या बैठकीत आरोग्यमंत्री ना.राजेश टोपे यांनी लसीचे डोस उपलब्ध होण्याचे प्रमाण कमी असल्यामुळे 1 मे पासुन लसीकरण होणार नसल्याचा निर्णय नाईलाजास्तव घ्यावा लागत असून, येत्या 6 महिन्यात 18 ते 44 या वयोगटातल्या सर्व नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाची समिती सूक्ष्म नियोजन करत आहे, अशी माहिती देखील राजेश टोपे यांनी दिल्याचे वृत्तसंस्थेने म्हटले आहे. मात्र शहरातील रूग्ण कल्याण समितीचे सदस्य असलेल्यांनी स्थानिक वर्तमान पत्रात जाहिरात देऊन 1 मे पासुन 18 वर्षावरील सर्वांना कोरोना प्रतिबंधात्मक लस घेता येणार यासाठी आज 28 एप्रिल पासुन www.cowin.gov.in या संकेत स्थळावर नोंदणी करावी असे सांगितले आहे. त्यामुळे राज्य सरकारचे आरोग्य मंत्री ना.राजेश टोपे की केंद्र सरकारचे भाजपा पदाधिकारी तथा रूग्ण कल्याण समितीचे सदस्य खरे की काय? असा प्रश्न जनतेला उपस्थित झाला असून 1 मेला कोरोना लस न मिळाल्यास भाजपाशी संपर्क साधावा, असे सुचवावयासे वाटते!