खळबळजनक : राहुरी येथे पत्रकाराची अपहरण करून हत्या

0

अहमदनगर : अहमदनगरमधील राहुरी येथे एका पत्रकाराची अपहरण करून हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली आहे. रोहिदास दातीर असे खून करण्यात आलेल्या पत्रकाराचे नाव आहे. गुन्ह्यात वापरलेले वाहन पोलिसांनी हस्तगत केले असून आरोपी राज्यातील एका सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते असल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे आता यावरून राजकारणही पेटण्याची चिन्हे आहेत.

दातीर यांचे काल दुपारी अपहरण झाले होते. रात्री उशिरा कॉलेज रोड परिसरात त्यांचा मृतदेह आढळून आला. पत्रकार दातीर मंगळवारी दुपारी बाराच्या सुमारास राहुरी शहरातील मल्हारवाडी रोडने आपल्या दुचाकीवरून घरी जात होते. सातपीर बाबा दर्गाजवळून जात असताना एका चार चाकी वाहनातून आलेल्या लोकांनी त्यांना मारहाण करून गाडीत बसविले आणि निघून गेले. पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी तेथे धाव घेतली. दातीर यांची दुचाकी आणि पायतील चप्पल घटनास्थळीच आढळून आली. दातीर यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो बंद होता. पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून शोध मोहीम हाती घेतली. सीसीटीव्ही आणि प्रत्यक्षदर्शींकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे अपहरणासाठी वापरण्यात आलेल्या वाहनाचा तपास लागला. पोलिसांनी ते ताब्यात घेतले. मात्र, आरोपी मिळाले नाहीत. आरोपी एका राजकीय पक्षाशी संबंधीत असल्याची माहिती पुढे आली आहे. दातीर यांनी एका प्रकरणात माहिती आधिकार वापरून केलेल्या पाठपुराव्यामुळे अडचणीत आल्याच्या कारणातून त्यांनी ही हत्या केली असावी, असा संशय व्यक्त होत आहे.

रात्री राहुरी कॉलेज रोड परिसरात दातीर यांचा मृतदेह आढळून आला. त्यांना अमानुष मारहाण करून त्यांची हत्या केली असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. दातीर यांची पत्नी सविता यांनी राजकीय नेत्याच्या जवळच्या व्यक्तीने अपहरण केल्याचा आरोप केला आहे. यापूर्वी अनेक वेळा दातीर यांच्यावर हल्ला झाला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.