नवी दिल्ली : भारतातील कोरोना संक्रमणाची परिस्थिती अतिशय धोकादायक वळणावर पोहचलीय, असं म्हणायला हरकत नाही. गेल्या २४ तासांत देशात तब्बल १ लाख १५ हजार ३१२ कोरोना संक्रमित रुग्ण आढळले आहेत. गेल्या २४ तासांत ६३१ जणांचा मृत्यू झाला आहे. याचसोबत करोना संक्रमणामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या १ लाख ६६ हजार २०८ वर पोहचलीय.
याआधी ५ एप्रिलला पहिल्यांदाच एक लाखांचा टप्पा पार करत सर्वाधिक दैनंदिन रुग्णवाढ नोंदवण्यात आली होती. यासोबत देशातील रुग्णांची एकूण संख्या १ कोटी २५ लाख ८९ हजार ६७ इतकी झाली आहे.
गेल्या वर्षी १७ सप्टेंबरला देशात ९७ हजार ८९४ रुग्णांची नोंद झाली होती. कोरोनाकाळातील ती सर्वाधिक दैनंदिन रुग्णवाढ होती. मात्र, आता महाराष्ट्रासह अन्य राज्यांत वेगाने रुग्णवाढ नोंदविण्यात येत असून नवा उच्चांक नोंदवण्यात आला आहे. यासोबतच देशातील कोरोनाबाधित रुग्णसंख्या १ कोटी २७ लाख ९९ हजार ७४६ इतकी झाली आहे. तसंच अॅक्टिव्ह करोना रुग्णांची संख्या ८ लाखांवर पोहोचली आहे.
दरम्यान महाराष्ट्रात गेल्या २४ तासात ५५ हजार रुग्णांची नोंद झाली असून दिल्लीत ५१०० नवे रुग्ण आढळले आहेत. सर्वाधिक फटका बसलेल्या राज्यांच्या यादीत महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू या राज्यांचा समावेश आहे.