खामगाव (प्रतिनिधी ) : कोरोना नावाच्या कथित आजाराने जिल्ह्यात अनेक व्यवसाय पाच वाजेनंतर बंद ठेवण्याचे आदेश काढले असून त्यामध्ये हॉटेल, भोजनालय, काही चाय, कोल्ड्रिंक्स ची दुकाने सुरू ठेवली आहे. सदर दुकाने खाद्य पदार्थ मध्ये मोडल्या जातात म्हणून त्यांना सूट दिले असल्याचे बोलले जात आहे. मग भाजीपाला व फळे हे खाद्य पदार्थ नाहीत का ? असा सवाल सत्याग्रह शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय संयोजक कैलास फाटे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना मेलद्वारे निवेदन देऊन केला आहे.
भाजीपाला हा मनुष्याच्या खाद्य पदार्थातील मुख्य असून यातील पालेभाजी ही एकच दिवस सुरक्षित राहू शकते तर इतर भाजीपाला व फळे हे सुद्धा नाशवंत असल्यामुळे भाजीपाला व फळे विक्रेत्यांना तसेच शेतकऱ्यांना आपला भाजीपाला खरेदी किंमती पेक्षा कमी किंमतीत विकावा लागतो किंवा फेकावा लागतो. तरी पोलीस प्रशासन भाजीपाला व फळे हे खाद्यपदार्थात कोणत्या उद्देशाने पकडत नाही हे एक कोडे आहे. भाजीपाला व फळे विक्रेते व शेतकरी हे गरीब असल्यामुळे त्यांना दुकाने सुरू ठेवण्याचा अधिकार नाही का ? ही चर्चा जनतेमध्ये होत आहे.
जर भाजीपाला व फळे ची दुकाने दिवसभर सुरू ठेवली नाही तर सत्याग्रह शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते पाच वाजेनंतर भाजीपाला व फळे ची दुकाने सुरू करतील असा इशारा फाटे यांनी दिला.