मुंबई । पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी संशयाच्या फेऱ्यात अडकलेले शिवसेनेचे नेते व वनमंत्री संजय राठोड हे आज पंधरा दिवसांनंतर सर्वांसमोर आले आहे. आज त्यांनी पोहरादेवी गडावर जाऊन संत सेवालाल महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतलं. त्यानंतर संजय राठोड यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी संजय राठोड यांनी पूजा चव्हाण प्रकरणात त्यांच्यावर झालेले सर्व आरोप फेटाळून लावले. हे सर्व आरोप चुकीचे आणि निराधार आहेत. प्रसारमाध्यमं आणि समाजमाध्यमांवर दाखवण्यात येत असलेल्या गोष्टींमध्ये कोणतेही तथ्य नाही असं सांगितलं.
दरम्यान, संजय राठोड यांची आजची पत्रकार परिषद म्हणजे निर्लज्जपणा आणि बेशरमपणाचा कळस आहे.तसेच राठोडांची अवस्था ही सामना चित्रपटातल्या भेदरलेल्या सरपंचासारखी झाली आहे अशी टीका भाजप नेते अतुल भातखळकर यांनी केली आहे.
अतुल भातखळकर यांनी संजय राठोड यांच्या पत्रकार परिषदेवरून जोरदार त्यांच्यावर हल्ला चढवला आहे. भातखळकर म्हणाले की “राठोड यांनी एकाही पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तर दिले नाही.तसेच केवळ समाजाची बदनामी करू नका.माझ्या कुटुंबाची बदनामी करू नका. माझे आई-वडील वृद्ध आहेत,असा भावनिक आवाहन करतं केवळ आणि केवळ बचावाचा प्रयत्न केला.पण हे सगळं निरर्थक आहे. राठोड यांच्यासारख्या लोकांच्या कृत्यामुळे आज राज्यातील महिला वर्गाची बदनामी होते. यासगळ्यावर न बोलता फक्त भावनिक आवाहन करणारी ही निरर्थक पत्रकार परिषद होती असं भातखळकर म्हणाले.
पत्रकार परिषदेत काय म्हणाले संजय राठोड?
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात आजपर्यंत मौन बाळगलेले मंत्री संजय राठोड यांनी या प्रकरणी पहिल्यांदाच भाष्य केले आहे. ते म्हणाले, ”बंजारा समाजातील मुलगी पूजा चव्हाण या तरूणीचा पुण्यात दुर्देवी मृत्यू झाला, या मृत्यूचा बंजारा समाजाला दु:खं झालंय, मात्र या प्रकरणावरून जे घाणेरडे राजकारण केले जातंय, ते अतिशय चुकीचं आणि निराधार आहे, मी मागासवर्गीय समाजाचं, ओबीसी, भटक्या कुटुंबातून येऊन नेतृत्व करतो त्यामुळे माझ्या सामाजिक, राजकीय जीवनाला उद्ध्वस्त करण्याचा प्रकार या माध्यमातून केला जात आहे, या प्रकरणाचा माझा काहीही संबंध नाही, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी तपासाचे आदेश दिलेत, या चौकशीत सगळ्या गोष्टी स्पष्ट होतील, पण माझी बदनामी करण्यासाठी घाणेरडे राजकारण करण्याचा प्रयत्न सुरू आहे, माझी, कुटुंबाची अन् समाजाची बदनामी करू नका, चौकशीतून जे काही सत्य आहे ते समोर येईल” असं राठोड यांनी सांगितले.