व्यापाऱ्यांच्या नांदी जो लागतो, त्याचा कार्यक्रम वाजतो – पालकमंत्री गुलाबराव पाटील

0

जळगाव ग्रामीण इंडस्ट्रीयल असोसिएशनचे फलक अनावरण उत्साहात 

 

जळगाव ( प्रतिनिधी) : व्यापार वाढवायचा असेल तर विश्वास महत्वाचा आहे. मी तुमचा विश्वास संपादन करायला आलो आहे. आपल्याला एमआयडीसी वाढवायची आहे. त्यासाठी चिंचोली भागातील भागपूर प्रकल्पातून पाणी घ्यावे लागेल त्यासाठी माझ्याकडे विभाग असल्याने मी सहकार्य करणार आहे. व्यापाऱ्यांच्या नांदी जो लागतो, त्याचा कार्यक्रम वाजतो. एका व्यापाऱ्याला दुखावले तर तो १०० मते जागेवरूनच फिरवून देतो. रिकामचोट पोरं जर कामाला लागले तर माझा अर्धा ताण कमी होतो, हे मला माहित आहे असे खणखणीत प्रतिपादन पालकमंत्री तथा राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. जळगाव तालुक्यात उमाळा- नशिराबाद रस्त्याजवळील भाग्यश्री पॉलिमर्स येथे जळगाव ग्रामीण इंडस्ट्रीयल असोसिएशनच्या फलक अनावरण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मंचावर  प्रमुख पाहुणे म्हणून लघु उद्योग भारतीचे अध्यक्ष किशोर ढाके, सचिव समीर साने, उमाळाचे सरपंच अनिल खडसे, नगरसेवक मनोज चौधरी, जळगाव ग्रामीण इंडस्ट्रीयल असोसिएशनचे अध्यक्ष सचिन लढढा, सचिव हमीद मेमन उपस्थित होते. प्रस्तावनेत संस्थेचे पदाधिकारी अनिल माळी यांनी असोसिएशन स्थापनेमागील उद्देश सांगत औद्योगिक विकास साधण्यासाठी लोकप्रतिनिधींचे सहकार्य महत्वाचे आहे, असे सांगितले. यावेळी किशोर ढाके यांनी सांगितले की, जळगावात औद्योगिक क्षेत्र अनेकवेळा मागास राहिले आहे. ग्रामीण भागात कंपन्या उघडण्यास समस्या येत असल्याने उद्योजक पुढे येत नाही. या समस्या सोडविल्या तर ग्रामीण भागात कंपन्या सहज येतील अशी माहितीदेखील त्यांनी दिली. यानंतर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले की,  जळगाव ग्रामीण पुरता विचार न करता जिल्ह्यातील देखील इतर औद्योगिक कंपन्यांचा विचार करावा. मी प्रथम व्हीआयपी कंपनीत कामाला होतो. त्यानंतर शहरात दत्ता सामंत यांची युनियन आली. त्याला आम्ही लोकांनी विरोध केला होता. कारण आम्हाला अंतर्गत युनियन चालेल मात्र बाहेरची युनियन चालणार नाही. कारण अशा बाहेरच्या युनियन कंपनीचे तर कंबरडे तोडते पण बेरोजगारांना देखील संपवते. माझ्या मतदारसंघात  कुठलीही बाहेरील युनियन नाही. काम करण्याची इच्छा असेल तर नक्की तरुणांना काम मिळते. ग्रामीण उद्योजकांचे सर्व प्रश्न तडीस नेईल, याची खात्री मी देतो. ग्रामीण भागात कंपन्या वाढल्या तर माझीही कॉलर टाइट होईल.

 

 

पुढे ते म्हणाले की, निम्नतापी हा प्रकल्प केंद्राकडे समाविष्ट नाही. आता केंद्राकडे त्याची शिफारस झाली आहे. त्यामुळे ग्रामीण भागात पाणी पोहोचण्यासाठी भागपूर प्रकल्पातून प्रयत्न केले जाणार आहे.  याला निधीची कमतरता नाही. याकडे पैसा पडून आहे. भागपूर धरणातून  वापरासाठी थेट पाणी औद्योगिक कामासाठी घेता येत नाही. उमाळ्याला पाण्याची योजना दाखवत आहोत. तीन दिवसात अधिकारी भेट देऊन सर्व्हे १५ दिवसात पूर्ण होईल. पाणीपुरवठा विभाग माझ्याकडे असल्यामुळे निधी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. निधी मंजूर करायला आता जिल्ह्याच्या, विभागाच्या अधिकाऱ्याना ५ कोटी पर्यंत मंजुरीचे अधिकार दिले आहेत. त्यासाठी मंत्रालयात अधिकाऱ्यांनी  यायची गरज ठेवली नाही. त्याचे विकेंद्रीकरण केले आहे. ५ कोटीपर्यंत पाणीपुरवठासाठी भागपूर प्रकल्पासाठी लागू शकतात. ते मिळण्यासाठी मी सहकार्य करेल, असेही आश्वासन त्यांनी दिले.

 

 

सूत्रसंचालन  शाम जगताप यांनी तर आभार हमीद मेमन यांनी मानले. कार्याक्रमासाठी राजीव बियाणी, नेमिष शह, आदर्श कोठारी, राजेंद्र ललवाणी, भगवान पटेल, राजीव पाटील, नरेश बागडे  तसेच पदाधिकारी यांनी  परिश्रम घेतले.

—————–

 

Leave A Reply

Your email address will not be published.