नवी दिल्ली : पूर्व लडाखमध्ये सुरू असलेल्या तणावात चीन आणखी एक मोठा कट रचत असल्याची माहिती समोर आली आहे. चीन हा भारताची अर्थव्यवस्था आणि परराष्ट्र धोरणांवरसुद्धा हेरगिरी करत आहे. मागच्या काही दिवसांपासून ज्यापद्धतीने घटना समोर येत आहेत त्यानुसार तपासात समोर आलं आहे की, चीनने त्यांच्या एका कंपनीतून भारताच्या अनेक संशोधक, थिंक टँक आणि मीडियाच्या संघटनांशी जोडलेल्या 200 लोकांची माहिती मिळवली आहे. इंडियन एक्सप्रेसने यासंबंधी वृत्त प्रकाशित केल्यानंतर झेन्हुआ डेटा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी कंपनी लिमिटेडच्या फेसबुकशी लिंक असलेल्या पेजवर फेसबुकने बंदी घातली आहे.
इंडियन एक्सप्रेसमध्ये प्रकाशित केलेल्या वृत्तानुसार, चीनचं सैन्य आणि गुप्तचर यंत्रणाशी जोडली गेलेली झेन्हुआ डेटा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी कंपनी लिमिटेडने ओव्हरसीज इंडिव्हिज्युअल डेटाबेस (OKIDB) अंतर्गत भारताच्या 40 सेवा देणारे आणि सेवानिवृत्त भारतीय विदेश सेवा (आईएफएस)चे अधिकारी, ज्यांनी प्रमुख राजकीय पदांना सांभाळलं आहे यांची माहिती गोळा केली आहे. चीनच्या या नव्या प्लानमध्ये धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. यामध्ये चीनने प्राध्यापक ते खासदार अशा सगळ्यांची माहिती मिळवली आहे. डेटाबेसमध्ये अशोक विद्यापीठाचे प्राध्यापक प्रताप भानु मेहता आणि द इंडियन एक्सप्रेसचे योगदान संपादक सी राजा मोहन यांचीही नावे आहे