अमळनेर : तालुक्यात 114 टक्के पाऊस पडल्याने काही भागात जमिनीत पाणी सिंचन होत नसल्याने एल आय सी कॉलनी परिसरात गल्ल्यांमध्ये गेल्या आठ दिवसांपासून रस्त्यावर पाणी साचल्याने नागरिकांना येण्याजाण्यास त्रास होत आहे.
आठ दिवसांपूर्वी सतत पाऊस पडल्याने एल आय सी कॉलनी परिसरात गल्ल्यांमध्ये भरपूर प्रमाणात पाणी साचले या भागात पाण्याचा निचरा होण्यासाठी गटारी नाहीत आणि अति पाऊस झाल्याने पाणी देखील जमिनीत जिरत नाही रिकामे पडलेले प्लॉट खोलगट भागात आहेत. त्यामुळे डबके साचले आहेत. मुख्य रस्ता गल्लीतील रस्त्यांपेक्षा उंच असल्याने साचलेले पाणी वाहून जात नाही परिणामी नागरिकाना पाण्यातूनच ये जा करावे लागत आहे. साचलेल्या पाण्यात डासांची उत्पत्ती देखील वाढल्याने नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. मलेरिया, तापाची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
पालिकेने पाण्याचा निचरा करावा आणि डबक्यांमध्ये तसेच पाणी साचलेल्या ठिकाणी मुरूम टाकण्यात यावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे त्याच प्रमाणे रस्त्यांच्या कडेला , खुल्या भूखंडात गाजर गवत ,झुडुपे वाढली आहेत गाजर गवताने नागरिकांना ऍलर्जी चा त्रास होतो म्हणून साफसफाई करून कीटक नाशक फवारणी करण्याचीही मागणी नागरिकांनी केली आहे.