पाचोरा (प्रतिनिधी) : तालुक्यात गेल्या चार महिन्यात कोरोना विषाणुने धैमान घातले आहे. कोरोनाची ही साखळी तोडण्यासाठी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांचे सुचनेनुसार आमदार किशोर पाटील यांनी दि. २५ जुलै ते ३१ जुलै दरम्यान शहरासह तालुक्यात आठवड्याचा लाॅकडाऊन घेण्यात आला होता. दि. ३१ जुलै ला लाॅकडाऊन संपल्यानंतर दि. १ आॅगस्ट रोजी सकाळ पासुनच नागरिकांनी प्रत्येक रस्त्यांवर एकच गर्दी करत सोशल डिस्टंन्सिंगाचा फज्जा उडविला. शहरासह ग्रामीण भागातील भाजीपाला विक्रेते मिळेल त्या जागेवर आपले दुकान थाटुन आपला व्यवसाय करीत होते.. प्रत्येक दुकानावर नागरिकांनी गर्दी केली होती.
त्यातच राज्यभर महायुतीचे महाएल्गार आंदोलन
एकीकडे सर्वत्र कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, दुसरीकडे विविध आर्थिक समस्येमुळे ग्रासलेला शेतकरी वर्ग यावर मात करण्यास महाविकास आघाडी सरकार सपशेल अपयशी ठरल्याचा आवाज उठवत महायुती सरकारतर्फे दि. १ आॅगस्ट रोजी राज्यभर “महाएल्गार आंदोलन” करण्यात आले.
पाचोरा पोलिसांचा चोख बंदोबस्त
एकीकडे लाॅकडाऊन उघडण्याचा पहिला दिवस, मुस्लिम बांधवांची बकरी ईद तर याच दिवशी महायुतीचे “महाएल्गार आंदोलन” हे सर्व एकाच दिवशी घडुन येत असतांना या जबाबदारीला पाचोरा पोलिस प्रशासनाने चोख उत्तर देत बंदोबस्त तैनात केला होता. यादिवशी एकीकडे रहदारीची व्यवस्था, बकरी ईदचा बंदोबस्त, त्यातच महायुतीचे महाएल्गार आंदोलन यावर मात करत पाचोरा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अनिल शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली, सहाय्यक पोलिस निरीक्षक विकास पाटील, गणेश चौबै, पोलिस काॅन्स्टेबल विकास सुर्यवंशी, सुनिल पाटील, किरण पाटील, मल्हार देशमुख, शाम पाटील, मुकुंद पाटील, गजेंद्र काळे सह होमगार्डच्या टीमने चोख बंदोबस्त ठेवला होता.