धक्कादायक! जुलै महिन्यात देशात दर तासाला २५ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू

0

मुंबई । देशात कोरोना संसर्गाचं प्रमाण झपाट्यानं वाढलं आहे. कोरोनाबाधितांची संख्या दररोज नवे रेकॉर्ड मोडीत काढत आहे. देशातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १६ लाखांच्या पुढे गेली आहे तर ३५ हजारांपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे. चिंताजनक बाब म्हणजे, फक्त जुलै महिन्यात भारतामध्ये ११.१ लाख कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून त्यापैकी १९ हजार १२२ जणांचा मृत्यू झाला आहे.

जुलै महिन्यात प्रत्येक दिवसाला ६०० पेक्षा जास्त कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. म्हणजेच भारतामध्ये जुलै महिन्यात सरासरी प्रत्येक तासाला २५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. भारतासाठी ही धोक्याची घंटा असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणे आहे. देशात करोनामुळे मरण पावणाऱ्यांच्या एकूण संख्येपैकी ४९ टक्के मृत्यू २० शहरांमध्ये झाले आहेत. या शहरात कोरोना संक्रमणाच्या सरासरीतही वाढ झालेली आहे. दुसरीकडे आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार ३० जूनपर्यंत देशात ५ लाख ६६ हजार ८४० इतकी कोरोना रुग्णांची संख्या होती. जुलै महिन्यात यात सर्वाधिक भर पडली आहे. जून महिन्याच्या तुलनेत जुलै महिन्यात करोनाबाधितांच्या संख्येत २.८ टक्क्यांनी वाढ झाली.

दरम्यान, भारत जगात कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यू झालेल्या देशांच्या यादीत पाचव्या स्थानी पोहोचला आहे. यापूर्वी पाचव्या स्थानी असलेल्या इटलीलाही भारतानं मागे सोडलं आहे. इटलीत करोनामुळे आतापर्यंत ३५ हजार १३२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या क्रमवारीत पहिल्या स्थानावर अमेरिका (१ लाख ५२ हजार ७०), ब्राझील (९१ हजार २६३), ब्रिटन (४६ हजार ८४) आणि मेक्सिको (४६ हजार) आणि पाचव्या स्थानी भारत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.