नवी दिल्ली : देशात कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढतच चालली आहे. मागच्या दोन दिवसांमध्ये सर्वाधिक धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. देशात मागील २४ तासांत ५५ हजार ७९ करोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. या वाढलेल्या संख्येमुळे देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या १६ लाखांच्या पुढे गेली आहे.
आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या १६ लाख ३८ हजार ८७१ इतकी झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत दहा लाख ५७ हजार ८०६ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. तर पाच लाख ४५ हजार ३१८ जणांवर उपचार सुरु आहेत. चिंताजनक म्हणजे गेल्या २४ तासांत ७७९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे तर एकूण करोनाबळी ३५ हजार ७४७ झाले आहेत.
दिल्लीमध्ये ३९०७, तमिळनाडूमध्ये ३७४१, गुजरातमध्ये २१४७, उत्तर प्रदेशमध्ये १५३०, पश्चिम बंगालमध्ये १४९०, आंध्र प्रदेशमध्ये १,२१३, मध्य प्रदेशमध्ये ८४३ जणांचा करोनामुळे बळी गेला आहे. मरण पावलेल्यांपैकी ७० टक्क्यांहून अधिक लोकांना एकाहून जास्त व्याधी होत्या. करोना रुग्णांचा देशातील मृत्यूदर २.२३ टक्के इतका असून जागतिक स्तरावरील मृत्यूदरापेक्षा तो कमी आहे. १९ जून रोजी देशातील मृत्यूदर ३.३ टक्के होता.
देशात सर्वाधिक मृत्यू आणि करोनाबाधित महाराष्ट्रात जास्त आहे. राज्यात मुंबई आणि पुण्याची परिस्थिती चिंताजनक आहे