मुंबई : राज्यात स्वबळावरील सरकार आणण्याच्या तयारीला लागण्याचे निर्देश भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी राज्यातील नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना दिले. यावरून आता शिवसेनेनं विरोधकांवर निशाणा साधला आहे. विरोधी पक्षाने आक्रमक व्हावे, पण स्वतःच निर्माण केलेल्या गुंत्यात फसून आरडाओरड करू नये. नड्डा हे संवेदनशील नेते आहेत. असा गोंगाट त्यांना चालत नाही. शूSSS शांतता राखा! आक्रमणाला वेळ आहे, असं म्हणत शिवसेनेनं भाजपावर हल्लाबोल केला. शिवसेनेनं सामनाच्या संपादकीयमधून विरोधकांवर टीकेचे बाण सोडले आहेत.
भाजपने स्वपक्षातील वैचारिक गुंता सोडवल्याशिवाय त्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या मनातले विचार कृतीत उतरणे कठीण आहे, असे एकंदरीत दिसते. प्रयत्न करून, जोरजबरदस्ती करून, घोडेबाजारात रान पेटवूनही एखादे सरकार पाडता येत नसेल तर मनाचा असा गोंधळ उडतो. तसा तो उडालेला दिसत आहे, असं म्हणत शिवसेनेनं भाजपावर टीका केली आहे.
काय म्हटलंय अग्रलेखात ?
राज्यातील महाविकास आघाडी सरकारविरोधात आक्रमक भूमिका घ्यावी, असे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी सांगितले आहे. महाराष्ट्रात भाजप हा प्रमुख विरोधी पक्ष आहे. त्यामुळे त्यांनी असा आक्रमक पवित्रा घेणे चुकीचे नाही. राज्यातील आगामी सर्व निवडणुका स्वबळावर जिंकू असा विश्वास नड्डा यांनी व्यक्त केला आहे.नड्डा यांनी महाराष्ट्रातील विरोधी पक्षाला दिलेल्या सूचनांचे स्वागत करायलाच हवे. खरे तर नड्डा यांनी हे सांगण्याचीही गरज नव्हती. नड्डा यांनी सांगण्याआधीच विरोधी पक्षांनी आक्रमणाच्या तोफांना बत्ती लावलीच होती, पण बत्ती लावली तरी तोफा निशाणा साधतातच असे नाही.
भारतीय जनता पक्ष सध्या जे राजकारण करीत आहे ते असे कोणते परमार्थाचे लागून गेले आहे! मध्य प्रदेशात त्यांनी सरकार पाडले ते काय संतसज्जनांचा मेळा जमवून नक्कीच पाडले नाही. राजस्थानमध्येही मंत्रोच्चार वगैरे करून तेथील सरकार अस्थिर केले नाही, तर सरळ सरळ पैशांचा वारेमाप वापर करून आवश्यक ते बहुमत विकत घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. महाराष्ट्रावर टीका करण्याआधी हे सत्य स्वीकारले पाहिजे.
गुजरात, मध्य प्रदेश, हरयाणा, कर्नाटक या राज्यांत कोरोना महामारीने जे अक्राळ-विक्राळ स्वरूप धारण केले आहे, त्याची संपूर्ण माहिती आम्ही महाराष्ट्र किंवा दिल्लीच्या भाजप कार्यालयात पाठवायला तयार आहोत. ही बहुतेक भाजपशासित राज्ये ‘स्वबळावर’च (तोडफोड करून) सत्ता भोगत आहेत व यापैकी अनेक राज्ये कोरोना संकट देवावर सोडून मोकळी झाली आहेत. गुजरातची स्थिती तर चिंताजनक आहे, पण त्याचे राजकारण होऊ नये