IPL च वेळापत्रक ठरलं, २० ऑगस्टला संघ रवाना होणार ! BCCI सूत्रांची माहिती

0

मुंबई  | आयपीएलच्या आगामी तेराव्या हंगामाच्या आयोजनाबद्दल बीसीसीआय अंतिम निर्णयापर्यंत पोहचल्याचं कळतंय. १९ सप्टेंबरपासून युएईमध्ये IPL स्पर्धेला सुरुवात होणार असून ८ नोव्हेंबरला स्पर्धेचा अंतिम सामना खेळवला जाईल. बीसीसीआयमधील सूत्रांनी पीटीआय वृत्तसंस्थेला याबद्दल माहिती दिली. आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलच्या आगामी बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब होणार असून बीसीसीआयने सर्व संघमालकांना याबद्दल प्राथमिक कल्पना देऊन ठेवलेली असल्याचं समजतंय.

“१९ सप्टेंबर ला स्पर्धेला सुरुवात होण्याची शक्यता आहे आणि ८ नोव्हेंबर ला स्पर्धेचा अंतिम सामना खेळवला जाईल. ५१ दिवसांचा हा कालावधी सर्व संघमालक, ब्रॉडकास्टर्स आणि इतर सदस्यांसाठीही योग्य आहे.” बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न घेण्याच्या अटीवर पीटीआयला ही माहिती दिली आहे. काही दिवसांपूर्वी आयसीसीने ऑस्ट्रेलियात प्रस्तावित टी-२० विश्वचषकाचं आयोजन वर्षभरासाठी पुढे ढकललं आहे. यानंतर बीसीसीआयकडून आयपीएलच्या तेराव्या हंगामाचं आयोजन करण्यासाठीच्या हालचालींना वेग आला होता.

याआधी 26 सप्टेंबर ला IPL सुरू करण्याचा विचार होता परंतु त्यानंतर असलेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या वेळापत्रकावर कोणताही परिणाम होऊ नये यासाठी बीसीसीआयने हे पाऊल उचलल्याचं कळतंय. प्रत्येक संघाला सरावासाठी किमान एका महिन्याची गरज असल्यामुळे २० ऑगस्टरोजी संघ युएईसाठी रवाना होतील. त्यानंतर सर्व खेळाडूंना सरावासाठी किमान ४ आठवडे मिळणार आहेत.

 

Leave A Reply

Your email address will not be published.