अमळनेर (प्रतिनिधी):- जालना जिल्ह्यातील मंठा येथील नवविवाहिता व तिच्या कुटुंबियांना न्याय मिळावा यासाठी अमळनेर शिवसेनेतर्फे तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की,जालना जिल्ह्यातील मंठा या गावात वैष्णवी नारायण मोरे या मुलीचा एका नराधामने दिवसाढवळ्या भर रस्त्यात खुन केल्याची घटना घडली. दुर्दैवाची बाब म्हणजे तिचा पाच दिवसांपूर्वीच विवाह झाला होता. लग्नानंतर पहिल्यांदाच ती माहेरी आली होती.तिचे वडील रिक्षा चालवुन उदरनिर्वाह करत होते. आर्थिक परिस्थिती अतिशय गरिबीची आहे.अशा परिस्थितीत त्यांनी मुलीचे लग्न केले लग्नानंतर पाच दिवसांनी त्यांना आपल्या मुलीचा दुर्दैवी अंत पहावा लागला.आपल्या महाराष्ट्रात प्रत्येक मुलीला सुरक्षित वाटले पाहिजे प्रत्येक स्त्रीला निर्भयपणे जगता आले पाहिजे असा कायदा व सुव्यवस्था प्रस्थापित होणे गरजेचे आहे. हे व्हावे यासाठी शिवसेनेचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी व लोकप्रतिनिधी या सर्वांच्या भावना शासन दरबारी पोहचाव्यात व अन्यायग्रस्त कुटुंबियांना न्याय मिळावा यासाठी शिवसेना तालुका अमळनेरच्या वतीने पुढील प्रमाणे मागण्या करण्यात येत आहे.
वैष्णवीगोरेंच्या खुनाचा खटला पोलीस यंत्रणेद्वारे निष्पक्ष कोणतीही त्रुटी न राहता कमीत कमी वेळात न्यायालयात खटला दाखल करणे,हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात दाखल करणे,तज्ञ सरकारी वकिलांची नेमणुक करणे, तसेच पोलीस स्टेशन ला मुलींच्या छेडखानी बाबत तक्रार आल्यास त्याची तात्काळ दखल घेऊन कार्यवाही करणे.निर्भया पथकाची जास्तीत जास्त संख्येने स्थापना करणे व मुलींमध्ये निर्भयता जागृती निर्माण करणे.
निवेदनावर शिवसेना तालुका प्रमुख विजय पाटील, शहर प्रमुख संजय पाटील,मनिषाताई परब,श्रीकांत पाटील ,प्रताप शिंपी,नितीन निळे,माने ताई,ज्ञानेश्वर पाटील आदींच्या स्वाक्षरी आहेत.