मुंबई । राज्यात दररोज कोरोना रुग्णांचा नवीन उच्चांक नोंदवला जात आहे. मागील २४ तासात राज्यात कोरोनामुळे २९५ बळींची नोंद झाली तर त्याचवेळी ७०७४ इतके कोरोनाचे नवीन रुग्ण आढळून आले आहेत. ही आजवरची एका दिवसातील सर्वाधिक रुग्णसंख्या ठरली असून राज्यातील करोना रुग्णसंख्येने दोन लाखांचा टप्पा पार केला आहे.
राज्यात आज ३३९५ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आजपर्यंत एकूण १,०८,०८२ करोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ५४.०२ % इतके झाले आहे. आज राज्यात ७०७४ नवीन रुग्णांचे निदान झाले तर आज २९५ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली. यापैकी १२४ मृत्यू मागील ४८ तासांमधील तर उर्वरित १७१ मृत्यू त्याआधीच्या कालावधीतील आहेत. सध्या राज्यातील मृत्यूदर ४.३३ % एवढा आहे. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १०,८०,९७५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २,००,०६४ (१८.५१ टक्के ) नमुने करोना पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५,९६,०३८ लोक होम क्वारंटाइनमध्ये आहेत तर ४१,५६६ लोक संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.