नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मंगळवारी दुपारी ४ वाजता देशाला संबोधित करणार आहेत. एकीकडे कोरोना विषाणूची आकडेवारी वेगाने वाढत आहे, दुसरीकडे, गलवाना खोऱ्यातील हिंसक संघर्षानंतर भारत-चीनमध्ये तणाव कायम आहे. अशा परिस्थितीत पंतप्रधान मोदी काय बोलणार याकडे सगळ्या देशाचं लक्ष असणार आहे.
दरम्यान, देशात अनलॉक 2 ची प्रक्रिया सुरू झाली आहे. रविवारी झालेल्या मन की बात मध्ये पंतप्रधानांनी नाव न घेता चीनला इशारा दिला होता. तर सोमवारीच सरकारने मोठा निर्णय घेत तब्बल 59 चिनी Appsवर बंदी घातली होती. कोरोना आणि नंतरचं लॉकडाउन या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी सातत्याने देशवासियांशी संवाद साधत असून त्यांनी याच माध्यमातून अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत.
दरम्यान, कोरोना वर नियंत्रण अजूनही मिळालेलं नसल्यामुळे अजूनही सार्वजनिक जीवनावर निर्बंध कायम असतील, असं केंद्र सरकारने जाहीर केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’मधून याची कल्पना दिलेली होती. आता केंद्राने औपचारिक घोषणा करत कुठल्या गोष्टींवर निर्बंध असतील, हे स्पष्ट केलं आहे. Unlock च्या पहिल्या टप्प्याप्रमाणे मेट्रो, मॉल, जिम यासह शाळा, कॉलेजही बंद राहतील, असं गृह मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटलं आहे.