माजी सरपंच जगन्नाथ बाविस्कर यांची मागणी
चोपडा (प्रतिनिधी): तालुक्यातील व्हाया घुमावल फाटा, खडगांव, गोरगावले बु., गोरगांवले खु.तसेच खेडीभोकरी पर्यंतचा डांबरीरस्ता अत्यंत खराब झाला असुन जागोजागी मोठमोठे खड्डे पडलेले आहेत.ह्या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी भरले असल्याने टु व्हिलर,फोर व्हिलर वाहनचालकांना अंदाज येत नसल्याने वाहने घसरणे,खड्डयात पडणे अशा घटना घडत आहेत.एखादं वेळेस मोठ्या वाहनांचाही अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.यासाठी संबंधित विभागाने हा रस्ता त्वरीत दुरूस्त करावा,अशी आग्रही मागणी गोरगांवलेचे माजी सरपंच.. जगन्नाथ टि.बाविस्कर यांनी ह्या पत्रकान्वये केली आहे.
चोपडा गोरगांवले हा रस्ता राज्यमार्ग म्हणुन मंजुर आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी की,सन २००० ते २००५ दरम्यान जगन्नाथ टि. बाविस्कर हे गोरगांवलेचे सरपंच असतांना त्यांनी ह्या रस्तादुरूस्तीसाठी पंचक्रोशितील शेकडों लोकांना सोबत घेऊन शासकीय विश्रामग्रुहापासुन तहसिल कार्यालयापर्यंत मुकमोर्चा काढलेला होता. तत्कालिन विधानसभाध्यक्ष अरूणलाल गुजराथी यांनी विशेष बाब म्हणुन रस्तादुरूस्तीसाठी मोठ्ठया प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिलेला होता.
तद्नंतर सन २०१० ते २०११ दरम्यान गोरगांवलेच्या एस्.टी.राखीव महिला सरपंच सौ.आशाबाई जगन्नाथ बाविस्कर यांनी पुन्हा ह्या रस्तादुरूस्तीसाठी ८ मार्च २०११ रोजी जागतिक महिलादिनानिमीत्त पंचक्रोशितील शेकडों महिलांना सोबत घेऊन चोपडा तहसिल कार्यालय येथे आमरण उपोषण केले होते.त्याप्रसंगी चोपड्याच्या माजी नगराध्यक्षा स्व.सुशिलाबेन शहा,महिला नेत्या सौ.इंदिराताई पाटिल यांनी पाठिंबा दिला होता.परंतु शासनाचे प्रतिनीधी आदिवासी आमदार तेथपर्यंत पोहोचले नव्हते.दुसर्या दिवशी सौ.बाविस्कर यांची तब्बेत पुर्ण खालावल्याची बातमी तत्कालिन जि.प.अध्यक्षा व माजी आमदार श्रीमती.स्मिताताई उदय वाघ यांच्यापर्यंत पोहोचल्याने त्यांनी तात्काळ उपोषणस्थळी भेट देऊन संबंधित अधिकारी व कर्मचारी यांची चांगलीच कानउघाडणी करून जि.प.अंतर्गत रस्तादुरूस्तीसाठी मोठ्ठया प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला जाईल,असे आश्वासन देऊन उपोषण सोडविले होते.व तात्काळ महिला सरपंच सौ.बाविस्कर यांना त्यांनी स्वत् चोपडा उपजिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते.व पुढिल काळात लवकरच रस्तादुरूस्तीसाठी निधीही उपलब्ध करून दिला होता.
तसेच हा रस्ता जि.प.कडुन सा.बां. विभागाकडे वर्ग करण्यात यावा,असाही ग्रामसभेचा ठराव सौ.आशाबाई ज.बाविस्कर यांनी त्यावेळेस पाठविला होता.त्यानुसार ह्या रस्त्याला राज्यमार्गाची मान्यता मिळाली आहे.पण आज ह्या रस्त्याची पुर्ण चाळणी झालेली असुन याआधी बरेच लहानमोठ्या अपघातांमुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे तर काहींना कायमचे अपंगत्वही आलेले आहे. आजही वाहनधारक,चालक,पादचारीशेतकरी,कामकरी यांना ह्या रस्त्यावरून वापरतांना मरणयातना सहन कराव्या लागत आहेत. यामुळे ग्रामस्थांना सांधेदुखी, पाठदुखी, कंबरदुखी, मणकेदुखी, मानदुखी अशा अनेक शारिरीक व्याधिंवर उपचार करून घ्यावे लागत आहेत. तसेच वाहनांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे,अशीही माहिती गोरगांवलेचे माजी सरपंच जगन्नाथ टि.बाविस्कर यांनी दिली आहे.