मेलबर्न : एलिसा हिली, बेथ मूनी यांच्या खणखणीत अर्धशतकी खेळीनंतर मेगन स्कट आणि जेस जोनासेन यांच्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाने आयसीसी टी-20 महिला विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीच्या सामन्यात भारताचा 85 धावांनी पराभव करत विजय नोदंविला. यासह ऑस्ट्रेलियाने पाचव्यांदा विश्वचषकावर नाव उमटविले आहे. याआधी ऑस्ट्रेलियाने 2010, 2012, 2014 आणि 2018 साली विश्वविजेतेपद पटकावले आहे. एलिसा हिली ही सामन्याची मानकरी ठरली तर बेथ मूनी हिला मालिकावीर म्हणून गौरविण्यात आले.
ऑस्ट्रेलियाने विजयासाठी दिलेल्या 185 धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरूवात चांगली झाली नाही. अवघ्या 58 धावांत भारताचा निम्मा संघ माघारी परतला होता. भारतीय संघाच्या शफाली वर्मा 2(3), जेमिमा राॅड्रिग्स 0(2), स्मृति मंधाना 11(8), हरमनप्रीत कौर 4(7) आणि वेदा कृष्णमूर्ति 19(24) या आघाडीच्या पाच फलंदाज झटपट बाद झाल्या. तर, रिचा घोष हिने 18(18) तर दीप्ति शर्माने सर्वाधिक 33(35) धावांची खेळी केली. त्यानंतर राधा यादव 1(2), शिखा पांडे 2(4) आणि पूनम यादव 1(5) धाव काढून बाद झाल्यानंतर 19.1 षटकांत 99 धावसंख्येवर भारताचा धाव संपुष्टात आला आणि भारताला 85 धावांनी पराभव पत्करावा लागला.
ऑस्ट्रेलियाकडून गोलंदाजीत मेगन स्कटने 3.1 षटकांत 18 धावा देत सर्वाधिक 4 तर जेस जोनासेन हिने 4 षटकांत 20 धावा देत 3 विकेट घेतल्या. तर, सोफिया मोलिनेक्स (4 षटकांत 21 धावा), डेलिसा किम्मिंस (4 षटकांत 17) आणि निकोला कैरी (4 षटकांत 23) हिने प्रत्येकी 1 विकेट घेतली.