बापरे..! एकाच कुटुंबातील 5 जणांचा आत्महत्येचा प्रयत्न
एका तरुणाचा मृत्यू; चहामधून घेतलं विषारी द्रव्य
लोकशाही न्यूज नेटवर्क
एकाच कुटुंबातील पाच जणांनी सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना पनवेल तालुक्यातील जावळे गावात घडली आहे. चहातून विष प्राशन केल्याने एका २२ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर इतर चौघांवर नवी मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे पनवेल परिसरात खळबळ उडाली असून, उलवा पोलीस अधिक तपास करत आहेत. आत्महत्येचे कारण अस्पष्ट आहे.
पनवेल तालुक्यामधील जावळे गावामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. तिथे एकाच घरातील पाच जणांनी सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला. जावळे गावात भाड्याच्या घरात राहणाऱ्या एकाच कुटुंबातील पाच जण बेशुद्ध अवस्थेत सापडले. या पाचही जणांनी चहामधून विषारी द्रव्य पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता, अशी माहिती पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आली आहे. त्यानंतर पाचही जण बेशुद्ध सापडले. या दुर्दैवी घटनेत त्या कुटुंबाती एका पुरुषाचा मृत्यू झाला आहे. संतोष बिरा लूहार असे त्याचे नाव असून तो 22 वर्षांचा होता.
मिळालेल्या माहितीनुसार, सामूहिक आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणारे हे कुटुंब मूळचे नेपाळी असून एकाच कुटूंबातील हे सदस्य गेल्या अनेक दिवसांपासून पनवेल तालुक्यातील जावळे गावात रहात होते.मात्र गेल्या 2-3 दिवसांपासून त्यांच्या घराचा दरवाजा बंद होता, तो उघडलाच नव्हता. त्यामुळे त्यांच्या शेजाऱ्याच्या मनात संयाची पाल चुकचुकली . अखेर त्या शेजाऱ्याने या घटनेबद्दल पोलिसांना आणि अग्निशमन दलाच्या जवानांना संपर्क साधला आणि सर्व प्रकार कथन केला.
माहिती मिळताच पोलीस व सूरक्षा यंत्रणेच जवान घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी जोर लावून त्या कुटुंबाच्या घराचा दरवाजा उघडला. तेव्हा त्या कुटुंबातील पाचही जण बेशुद्ध अवस्थेत आढळले. त्या सर्वांना तातडीने उपचारासाठी पनवेल येथील नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्या कुटुंबातील लोकांपैकी 22 वर्षीय संतोष बिरा लूहार याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगीतले.
या दुर्दैवी घटनेत 23 वर्षीय रमेश बिरा लोहार, त्यांची पत्नी बसंती व पाच वर्षांचा मुलगा आयुष आणि दोन वर्षांचा आर्यन हे सुद्धा बेशुद्ध असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू झाले. अतिदक्षता विभागाची गरज असल्याने या चौघांना पुढील उपचारासाठी नवी मुंबई येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. यातील दोन लहान मुलांची प्रकृती स्थिर आहे. मात्र या 5 जणांनी, लहान मुलांनी देखील आयुष्य संपवण्याचा प्रयत् का केला हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.