लोकशाही न्यूज नेटवर्क

पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे विषारी दारु पिऊन जवळपास 14 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. दारूत मिथेनॉल मिसळल्याने ही दुर्देवी घटना घडली. पोलिसांनी या प्रकरणी मुख्य आरोपी योगेश वानखेडे याला अटक केली आहे. दारू अड्ड्याचा मालक कर्नलसिंह विरखासह आठ जण अटकेत आहेत. ज्या दारु अडड्यामुळे ही दुर्देवी घटना घडली, तिथे रोहित पवार स्वत: पोहोचले व त्यांनी काऊंटर फोडला. रोहित पवारांसह शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हा दारु अड्डा फोडून टाकला. तिथे लावलेले पत्रे उखडले. “जेव्हा सिस्टिम काम करत नाही, जेव्हा पोलीस प्रशासन कमी पडतं, तेव्हा आम्हाला लोकांना एक संदेश द्यायचा आहे, काही गोष्टी हातात घ्याव्या लागतील. लहान मुलींवर अत्याचार होतो, महिलांवर अत्याचार होतो, सिस्टिम मदत करत नाही, अजितदादांच्या बाबतीत सिस्टिम मदत करत नाही” असं रोहित पवार म्हणाले.
“दारु पिऊन गरीबाची माणसं मरतात. सिस्टिम काहीही करत नाही. त्यावेळी लोकांना कायदा हातात घ्यावा लागतो. कार्यकर्त्यांनी दारु अड्ड्यांची तोडफोड केलीय. बुलडोझर धर्म बघून चालवला जातो. सामान्य लोकांचा जीव जातो, तेव्हा प्रशासन शांत बसतं” अशा शब्दात रोहित पवार यांनी आपला संताप व्यक्त केला. त्याआधी ते ससून रुग्णालयात गेले व विषारी दारुमुळे अडचणीत असलेल्या पीडित कुटुंबांची भेट घेतली.
“पोलिसांना विचारल्यावर सांगतात, अजून कारण कळलेलं नाही. पोलीस कोणाचीतरी पाठ राखण करण्याचा प्रयत्न करतात. एक जण स्वतहून ताब्यात येतो. पुढचा तपास होऊ नये यासाठी हे सगळं चाललं आहे. पोलिसांनीच एकाला सरेंडर व्हायला सांगितलं. म्हणजे तपास होणार नाही, मोठा मासा यातून सुटेल” असा आरोप रोहित पवार यांनी केला.
या विषारी दारु प्रकरणात कोणालाही सोडणार नाही. कठोरात कठोर कारवाई करु असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. आरोपी योगेश वानखेडे हा दारू वितरीत करण्याचं काम करत होता. मात्र दारूचं वितरण करत असतानाच तो मध्येच गाडी थांबवून त्याने दारूत मिथेनॉल मिसळलं होतं, असं समोर आल्याचं पोलिसांनी साांगितलं.


