जिल्ह्याची आढावा बैठक पालकमंत्र्यांनी तासभरात आटोपवली
जळगाव :- राज्यात दुष्काळाचे संकट असल्याने एप्रिल, मे महिन्यात स्थिती अवघड होणार आहे. सध्या स्थितीत कामे जास्त व मजूर कमी असल्याने १०० दिवसांऐवजी ३६५ दिवस काम मजुरांसाठी रोहयो अंतर्गत मंजूर करण्यात आले असून १७५ दिवसांचे मजुरी राज्य शासन व उर्वरित केंद्र शासनाने भर उचलला आहे. दिवसाला 212 रुपये मजुरी देण्यात येत आहे, अशी माहिती राज्याचे महसूलमंत्री तथा पालकमंत्री ना. चंद्रकांत पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालय येथे झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सांगितले.
लोकसभा निवडणूक आचारसंहिता लागू होण्याआधी राज्य सरकारकडून विविध कामांचा घेण्यासाठी पालकमंत्री यांची आज आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यापूर्वी तीनवेळा जिल्हा नियोजन समितीची बैठक या-ना त्या कारणाने रद्द करण्यात आली होती. यावेळी देखील कदाचित आचारसंहिता लागू झाल्यास रद्द होते की काय? असे प्रश्न चिन्ह होते. मात्र जिल्ह्यासाठी कुठलीही ठोस घोषणा न करताच धावता दौरा करीत त्यांनी आज अजिंठा विश्रामगृहात दुष्काळी आढावा व नियोजन समितीची बैठक अधिकाऱ्यांसमवेत अवघ्या तासभरात चर्चा आटोपली.
यावेळी ते म्हणाले, 2022 पर्यंत देशातल्या पायाभूत सुविधा पूर्ण होतील. मागेल त्याला घर, मागेल त्याला शौचालय या योजनांचे लाभार्थी यांना लाभ देण्यात यावा. प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेअंतर्गत ६ लाख ९१ हजार कुटुंब लाभार्थी नावे पात्र आहेत. त्यापैकी २ लाख ९२ हजार कुटुंब माहिती अपलोड करण्यात आली आहे. धरणगाव तालुक्यात बोंड अळीचे अनुदान प्राप्त झाले नाही. त्यासंदर्भात ना.गुलाबराव पाटील व जिप सदस्य गोपाल चौधरी यांनी प्रश्न उपस्थित केल्यानुसार ना.चंद्रकांत पाटील यांनी जिल्हा बँक व संबधित अधिकाऱ्यांशी जिल्हाधिकारी यांनी विचारणा करावी, असे मार्गदर्शन केले, तसेच तालुक्यात वन विभागात पाण्याची कमतरता भासत असल्याने त्यातील वन्य प्राणी वस्तीमध्ये वावर वाढत असल्याने पशुहानी झालेली आहे. ते होऊ नये यासाठी वन्यप्राण्यासाठी पाण्याची व्यवस्था तसेच पाणी साठ्यांचे खोलीकरण गळ काढणे आदि कामांसह रोजगार हमी योजनेअंतर्गत तार वा काटेरी कंपाऊड करण्यात यावे असे, आ. खडसे यांनी या बैठकीत बोलताना सांगितले.
यांची होती उपस्थिती
माजी महसूल मंत्री तथा आ.एकनाथराव खडसे, ना. गिरीष महाजन, ना. गुलाबराव पाटील, खा. रक्षा खडसे, जिप अध्यक्ष ना. उज्वला पाटील, महापौर सीमा भोळे, गुरुमुख जगवानी, जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे, जि.प.सीईओ डॉ.बी.एम.पाटील, मनपा आयुक्त चंद्रकांत डांगे आदि या व्यासपीठावर उपस्थित होते.
जिप सदस्य प्रभाकर सोनवणे, आ. संजय सावकारे, आ. स्मिता वाघ, आ.चंद्रकांत सोनवणे, आ. राजूमामा भोळे, नगराध्यक्ष सुनील काळे जिप सदस्य व नियोजन समितीचे सदस्य आदि उपस्थित होते.