नवी दिल्ली : महाराष्ट्रात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांची आघाडी जवळपास निश्चित झाली आहे आणि सत्तेची तयारीही सुरू झाल्याचं सांगितलं जातंय. मात्र, हे सरकार स्थापन जरी झालं तरी ते टिकणार नाही, असं केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नितीन गडकरी म्हणाले आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी ही संधीसाधू आघाडी आहे. ही आघाडी महाराष्ट्राला स्थिर सरकार देऊ शकणार नाही, असंही नितीन गडकरी यांनी महाराष्ट्रात स्थापन होत असलेल्या महासेनाआघाडीच्या सरकारवर टीकास्त्र सोडलं.
याशिवाय नितीन गडकरी यांनी “भाजप आणि शिवसेनेची युती ही हिंदुत्वावर आधारीत होती. आजही आमच्या विचारधारेत फरक नाही. अशी युती तोडणं हे देशाचंच नाही तर हिंदुत्वाचंही नुकसान आहेच, शिवाय महाराष्ट्राचंही मोठं नुकसान आहे” असं म्हटलं.
मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. त्यामुळे महाराष्ट्रात अस्थिर सरकार राहणं हा गुंतवणुकीच्या दृष्टीने चिंतेचा मुद्दा मानला जातो. याकडेही गडकरींनी लक्ष्य वेधलं. ‘या तीन पक्षांमध्ये (काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना) विचारधारेचं अंतर आहे. त्यामुळे सरकार टिकणार नाही आणि महाराष्ट्राला अस्थिर सरकार परवडणारं नाही,’ असंही गडकरी म्हणाले.