मुंबईः बहुचर्चित सिंचन घोटाळाप्रकरणी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून (एसीबी) पूर्णपणे क्लीन चिट देण्यात आली आहे. एसीबीने हायकोर्टात प्रतिज्ञापत्र सादर करुन अजित पवारांना निर्दोषत्व दिलं. याआधी एसीबीने जलसिंचन घोटाळ्याशी संबंधित उघड चौकशीची नऊ प्रकरणे बंद करण्यास मंजुरी दिली होती. त्यावेळी एसीबीने ही सर्व प्रकरणे अजित पवार यांच्याशी संबंधित नसल्याचा दावा केला होता.
उच्च न्यायालयामध्ये सिंचन घोटाळ्यासंदर्भात जनमंच संस्था व व्यावसायिक अतुल जगताप यांनी या याचिका दाखल केल्या आहेत. जगताप यांनी गेल्या तारखेला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या प्रामाणिकेतवर संशय व्यक्त करून सिंचन घोटाळ्याची चौकशी सीबीआय, ईडी किंवा अन्य स्वतंत्र संस्थेकडे हस्तांतरित करण्याची मागणी केली होती. त्यावर या प्रतिज्ञापत्रात स्पष्टीकरण देण्यात आले आहे. 26 नोव्हेंबर 2018 रोजीच्या प्रतिज्ञापत्रात अजित पवार सिंचन घोटाळ्यास जबाबदार असल्याचे सांगण्यात आले होते. परंतु, तो निष्कर्ष त्यावेळी उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारावर काढण्यात आला होता. त्यानंतर तपासात बरीच प्रगती झाली.
दरम्यान अजित पवार यांना सिंचन घोटाळ्याप्रकरणी मोठा दिलासा मिळाला आहे. एसीबीकडून त्यांना पूर्णपणे क्लीनचीट देण्यात आले आहे. सिंचन घोटाळ्यात अजित पवार पूर्णपणे निर्दोष असल्याचे प्रतिज्ञापत्रात एसीबीने नमूद आहे. एसीबीने उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. मात्र उच्च न्यायालयात अजित पवार यांना क्लीनचीट दिलेली नाही. त्यामुळे उच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे लक्ष लागले आहे. पुढील महिन्यात उच्च न्यायालय निर्णय देण्याची शक्यता आहे.