मुंबई: अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळं निसर्ग चक्रीवादळ निर्माण झालं आहे. आज दुपारी १ वाजेच्या सुमारास निसर्ग चक्रीवादळ अलिबाग आणि श्रीवर्धन जवळ किनारपट्टीला धडकले आहे. वादळ धडकल्यानंतर ताशी 100 ते 120 किलोमीटर चक्रीकार वारे वाहून पाऊस पडत आहे.
दरम्यान, मुंबई च्या दिशेने जाणाऱ्या या वादळाने दिशा बदलली आहे. हे वादळ आता पनवेल, कर्जत, खोपोली, नाशिक या मार्गाने जाणार असल्याची माहिती डॉ. अनुपम कश्यपी, प्रमुख हवामान संशोधक, पुणे वेधशाळा यांनी वर्तवली आहे.पुढील काही तासात हे वादळ मुंबईसह राज्यातील इतर जिल्ह्यातून जाणार असल्याची माहिती सांगितली जात होती. मात्र मुंबईकरांसाठी आता दिलासादायक बाब आहे.
या वादळाच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यातील काही भागात आज दुपार पासून जोरदार पावसाने सुरुवात केली आहे. हे वादळ उत्तर महाराष्ट्र च्या दिशेने येत आहे. त्यामुळे खबरदारी घेणे अत्यंत गरजेचं आहे.