मुंबई : राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपलं असून आज शिवसेनेने सामना अग्रलेखातुन भाजपवर कडाडून टीका केली आहे. सत्ताधाऱ्यांचे कामकाज रोखण्याशिवाय विरोधकांनी काय दिवे लावले असा थेट सवाल सामनातून करण्यात आला होता. दरम्यान सामनातील या टिके बद्दल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना विचारले असता त्यांनी खास शैलीत शिवसेनेला टोला लगावला.
फडणवीस म्हणाले, जनहिताचे मुद्दे उचलणं जशी आमची जबाबदारी आहे तशी वृत्तपत्रांचीदेखील आहे. आम्ही वीजेबद्दल, शेतकरी, कोविडबद्दल बोललो. पण त्यांना जनहिताचे मुद्दे दिसले नाहीत. त्यांना केवळ टोचणारे आणि बोचणारे मुद्दे दिसले. असा अग्रलेख आल्याने घाव वर्मी बसला आहे हे लक्षात आलं आहे”.
अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान सरकारने आम्ही वीज जोडणी कापणार नाही. त्याला स्थगिती दिली आहे, असे सांगितले होते. पण शेवटच्या दिवशी अतिशय थातूरमातूर निवदेन करुन पुन्हा एकदा वीज जोडणी कापणी सुरु केलं आहे. त्यामुळे आम्ही या सरकारचा विरोध करण्यासाठी आंदोलन करणार आहेत. तसेच यामुळे हे सरकार शेतकरी विरोधी आणि गरीब विरोधी आहे, हे स्पष्ट झालं आहे,” अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली.