श्री जगद्गुरु श्रीनृसिंहसरस्वती दत्त महाराज जयंती

0

दिनांक ०४/०१/२०२२ रोजी मंगळवारी पौष शुक्लपक्ष द्वितीयाला श्री जगद्गुरू अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज श्री श्री श्री श्रीगुरू नृसिंहसरस्वती दत्त महाराज यांची ६४४ वी जयंती आहेत….

माधवशास्त्री स्त्री अंबिका कारंज सती थोर l पूर्वजन्मी तिजसि श्रीवल्लभ वर llपुढील जमनी तव कुशि धरीन अवतार l म्हणवूनी आंबे कुशि आलेऐका तिथिवारllद्वितीया पौष शुध्द शततारावरी,l माध्यान्ही अवतरले नरहरि शनिवारी ll त्रिगुण यतिधारी ll

प्रमाण: श्रीगुरूचरित्रात 

भगवान श्रीगुरूनृसिंहसरस्वती महाराज

औदुंबरा तळवटी नरसिंहयोगी।

कृष्णातटी परम शांत सुखास भोगी॥

ध्यानस्त होऊनि समस्त चरित्र पाहे।

अन्यन्य जो शरण इच्छित देत आहे॥

कारंजा येथील श्रीनृसिंह स्वामींचे जन्मस्थान विषय माहिती 

“काळे वाडा”.

कारंजा महत्व

कारंजा हे पौराणिक आणि ऐतिहासिक नाव श्री करंज ऋषींनी ठेवले. पूर्वी या गावाला करंजनगरी म्हणून ओळखत. या गावांत पाण्याचे दुर्भिक्ष होते. म्हणून या करंज ऋषींनी हातात कुदळ घेवून तलाव खोदण्यास सुरूवात केली. त्याच वेळी उत्तरेतून एक ऋषींचा संघ येथे आला. त्यांनी आपआपल्या कमंडलूतील जल तेथे ओतले आणि एक मोठा जलाशय तयार झाला. हा जलाशय आजही ऋषी तलाव या नावाने ओळखला जातो.

श्रीगुरूनृसिंहसरस्वती महाराज- 

(इ.स. १३७८-१४५८) हे श्रीपाद वल्लभ यांच्यानंतरचे दत्तात्रेयांचे दुसरे पूर्णावतार मानले जातात.नरसोबाची वाडी, औदुंबर व गाणगापूर येथे त्यांच्या पादुका असून लाखो भक्त सेवेसाठी तेथे जातात.

वाशिम जिल्ह्यातील कारंजा (लाड) या गावी देवी अंबाभवानी आणि देव माधव।  काळे यांच्या पोटी श्रीगुरु नृसिंह सरस्वतींनी याचा जन्म झाला .

श्री महाराजांचा शततारका नक्षत्रावर जन्म झाला व जन्मनाव शाळिग्रामदेव हे होते. नंतर मोठ्या थाटाने त्याचे बारसे साजरे करून नरहरी हे व्यावहारिक नाव विधीपूर्वक ठेवण्यात आले.

संपूर्ण माहिती पाहू……

श्री श्रीगुरूनृसिंह सरस्वती

जन्म: लाडाचे कारंजा, पौष शुद्ध इ. स. १३७८

आई/वडिल: आंबामाता / माधव

वेष: संन्यासी

मुंज: इ. स. १३८५

गुरु: कृष्णसरस्वती

संन्यास: इ. स. १३८८

तिर्थाटन: इ. स. १३८८ ते  १४२१

औदुंबर चातुर्मास: इ. स. १४२१

नरसोबावाडी: इ. स. १४२२ ते  १४३४

गाणगापुर: इ. स. १४३५ ते  १४५८

कार्यकाळ: इ.स. १३७८ ते १४५८

निजानंदीगमन: इ. स. १४५८

विशेष: दत्तावतार, धर्मसंस्थापनेचे कार्य चरित्र ग्रंथ, श्री गुरुचरित्र

शिष्यपरंपरा:

१) माधव सरस्वती

२) बाळसारस्वती

३) कृष्णसरस्वती

४) उपेंद्र माधव सरस्वती

५) सदानंद सरस्वती

६) ज्ञानज्योति सरस्वती

७) सिद्ध सरस्वती

। विश्वाव्यापक तूंचि होसी । ब्रम्हा विष्णू व्योमकेशी ।। धरिला वेष तू मानुषी । भक्तजन तारावया ।।१०।।

श्री गुरुदेव दत्त हा परमेश्वराचा ‘अनंत कालाचा अनंत भावाचा । अनंत जीवाचा कनवाळू’ अवतार आहे. ‘नाश कल्पान्तीही असेना’ असा हा अवतार आहे. ‘नाना अवतार होऊनिया गेले । दत्तत्व संचले जैसे तैसे ।’ अशी या अवताराची थोरवी प्रज्ञाचक्षू गुलाबमहाराज वर्णन करतात. हा अवतार ‘भोगमोक्षसुखप्रद:’ आहे.

श्रीपाद श्रीवल्लभ हा श्रीदत्तप्रभूंचा दुसरा अवतार. ‘कलौ श्रीपाद श्रीवल्लभ:’ अशी या अवताराची ख्याती आहे. श्रीनृसिंह सरस्वती हे श्रीदत्तप्रभूंचे तिसरे आणि श्रीपाद श्रीवल्लभांचे उत्तरावतार आहेत. तेच पुढे श्री अक्कलकोट स्वामी समर्थ म्हणून प्रसिद्धी पावले.

श्रीनृसिंह सरस्वती दत्तोपासनेचे संजीवक होते. तेराव्या शतकाच्या अखेरीस दत्तोपासनेच्या पुराणप्रवाहात संजीवन ओतण्याचे कार्य श्रीनृसिंह सरस्वतींनी केले. समग्र महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनात ते दीपस्तंभासारखे मार्गदर्शक ठरले.

श्री श्रीगुरू नृसिंहसरस्वतीचा अवतार काल शके १३०० ते १३८० (इ.स. १३७८ ते १४५८) असा आहे. श्रीगुरुचरित्र हा अपूर्व ग्रंथ दत्तसंप्रदायाचा वेदतुल्य, प्राणप्रिय ग्रंथ आहे. प्रापंचिकांचा आणि पारमार्थिकांचा तो मनोकामना पूर्ण करणारा चिंतामणीच आहे. या वेदतुल्य गुरुचरित्राचे चरित्रनायक आहेत. श्री नृसिंह सरस्वती. श्री गुरूचरित्रात अध्याय ११ ते ५१ या अध्यायात त्यांचे समग्र लीलाचरित्र आलेले आहे. श्री नृसिंह सरस्वती संन्यासधर्माचे सर्वोत्तम आदर्श होते.

श्री श्रीगुरूचा जन्म व बालपण 

पूर्वावतार श्रीपाद श्रीवल्लभांच्या कृपाशीर्वादाने शनिप्रदोष व्रत करून शिवोपासना करणारी कुरूगड्डीची अंबाबाई वऱ्हाड प्रांतात, करंज नगरात वाजसनेय शाखेच्या ब्राह्मणाची सुकन्या होऊन जन्माला आली. याही जन्मी तिचे नाव ‘अंबा’ असेच ठेवण्यात आले. पूर्वसंस्कारानुरूप ती या जन्मीसुद्धा शिवभक्ती करू लागली. त्याच ग्रामातील माधव नामक शिवोपासक तरुणाशी तिचा विवाह झाला. विवाहोत्तर तिचे मूळचे ‘अंबा’ हेच नाव कायम ठेवण्यात आले. हे ईश्वर-निष्ठदाम्पत्य श्री शिवोपासनेत मग्न असतानाच श्रीदत्तप्रभूंनी वचन दिल्याप्रमाणे पौष शुद्ध द्वितीयेला, शनिवारी माध्यान्हकाळी त्यांच्या पोटी सुपुत्र रूपाने अवतार धारण केला- हेच श्री नृसिंह सरस्वती होत.

जन्म होताचि ते बालक । ॐ कार शब्द म्हणतसे अलौकिक

पाहून झाले तटस्थ लोक । अभिनव म्हणोनि तये वेळी ॥

जन्मताच ते ॐचा जप करू लागले. सर्वसामान्य मुलाप्रमाणे रडले नाहीत. त्यामुळे सर्वांना आश्चर्य वाटले. तत्कालीन महान ज्योतिषांनी हा मुलगा साक्षात ईश्वरावतार असल्याचे सांगितले. हा लौकिक मुलगा श्रीहरीप्रमाणे सर्व नरांचे पाप, ताप, दैन्य हरण करणारा होईल म्हणून याचे नाव ‘नरहरी’ असे ठेवावे असे त्यांनी सुचवले.

याच्या स्पर्शाने आईच्या स्तनांतून अमाप दूध स्रवत असे. कौतुकात बाळ वाढू लागले. पण वय वाढत चालले तरी ॐकाराखेरीज कोणताच शब्द त्याला बोलता येत नसे. हा मुलगा मुका निघणार की काय ? अशी शंका आली. सात वर्षांपर्यंत बाळाने दुसरा शब्दच कधी उच्चारला नाही. त्याच्या मुंजीचा बेत ठरला. पण हा कुमार मंत्रोच्चार कसा करणार, म्हणून सर्वांना काळजी होती. बाळाने नाना चमत्कार करून दाखविले. लोखंडाला हात लावताच त्याने बावन्नकशी सोने करून दाखविले. मुलाचे समार्थ्य प्रत्ययास येऊन

‘तूं तारक शिरोमणी । कारणिक पुरुष कुळदीपक ॥ तुझेनि सर्वस्व लाधलें । बोलतां आम्हीं नाहीं ऐकिलें । अज्ञानमायेनें वेष्टिलें । मुकें ऐसें म्हणों तुज ॥’ (११.५७-५८)

अशी कबुली मातेने दिली

यथाविधी नरहरीचा व्रतबंध करण्यात आला. गायत्री मंत्राची दीक्षा घेऊन कुमार मातेजवळ भिक्षेसाठी आला. या वेळी बाळाने ऋग्वेदातील मंत्राचा स्पष्ट उच्चार केला, ‘अग्निमीळे पुरोहितं’ या मंत्राचा उच्चार ऐकताच सर्वांना नवल वाटले. यजुर्वेद, सामवेद म्हणून बाळाने सगळ्या लोकांना चकित केले. हा कुमार अवतारी पुरुष असल्याची खात्री सर्वांना पटली. मातेला बाळाने एक भिक्षा मागितली, ‘निर्धार राहिला माझिया चित्ता । निरोप द्यावा आम्हां त्वरिता । जाऊं तीर्थे आचरावया ॥’ (११.८३) वेदाभ्यास करण्यासाठी सर्वत्र संचार करण्याचा बाळाचा मानस पाहून मातापित्यांस दु:ख झाले. पुत्र रक्षक होईल, या आशेवर जगलेल्या मातेची निराशा झाली. आईचे दु:ख ओळखून मुलाने तिला ब्रह्मज्ञान सांगितले. तिला आणखी चार पुत्र होतील असे आश्वासन दिले आणि पूर्वजन्माची स्मृती करून दिली. त्याबरोबर ‘श्रीपादश्रीवल्लभ स्वरूपता । दिसतसे तो बाळक ॥’ (११.९३) या श्रीपादरूपी नरहरीला ओळखून मातेने बालकाचे चरण धरले.

मुंजीनंतर ते लवकरच तीर्थयात्रेला निघाले. पण वत्सल मातेच्या आग्रहास्तव ते एक वर्ष करंज ग्रामातच राहिले. मातेला आणखी दोन सुपुत्रांची प्राप्ती झाल्यानंतर ते श्री क्षेत्र काशीला निघाले. प्रयाणकाली त्यांनी मातेला त्रैमूर्ती दत्त-स्वरूपात दर्शन देऊन पूर्वावतारातील श्रीपाद श्रीवल्लभ आपणच असल्याचे दाखवून दिले. स्मरण करशील त्यावेळी मी तुला दर्शन देईन असे आश्वासन देऊन ते श्री क्षेत्र काशीला निघाले.

श्रीगुरुंचे काशीक्षेत्री प्रयाण 

श्री क्षेत्र काशीला त्यांनी उग्र अनुष्ठान आरंभले. या बाल ब्रह्मचारी साधूची ती भक्तियुक्त पण कठोर साधना, तपश्चर्या पाहून श्री क्षेत्र काशीतील लहानथोर, विद्वान पंडित, आबालवृद्ध आश्चर्यचकित झाले. सर्वजण त्यांना विनम्रभावाने नमस्कार करू लागले; पण इच्छा असूनही संन्यासी लोकांना नमस्कार करता येईना. म्हणून काशीतील तत्कालीन ख्यातकीर्त, सर्वश्रेष्ठ, वयोवृद्ध संन्यासी श्रीकृष्णसरस्वती स्वामींनी त्यांना चतुर्थाश्रम स्वीकारण्याची विनंती केली. पितृतुल्य ऋषितुल्य श्री स्वामींच्या विनंतीला मान देऊन त्यांनी संन्यासदीक्षा स्वीकारली. वृद्ध श्री कृष्णसरस्वती स्वामींनीच त्यांना चतुर्थाश्रमाची दीक्षा दिली. त्यांच्या हाती दंड दिला. त्यांचे ‘श्री नृसिंहसरस्वती’ असे नूतन नामकरण केले.

पायी खडावा, कटीला कौपीन अंगावर भगवी छाटी, गळ्यात रुद्राक्ष माळा, हातात दंड कमंडलू, कपाळी भस्म, मुखावर सात्त्विक स्मितहास्य, संपूर्ण देहावर तपश्चर्येचे तेज, हृदयात ब्रह्मानंद असलेले दत्तावतारी श्री नृसिंहसरस्वती सर्वांना साक्षात श्री काशीविश्वेश्वरच वाटत. त्यामुळे संन्याशांसह सर्व काशीकर जन त्रिभुवनवंद्य श्री नृसिंहसरस्वती स्वामींना विधियुक्त वंदन करीत. अत्यंत विनयाने, प्रेमाने त्यांना शरण येत. त्यांच्या दर्शनाने सर्व धन्य होत. कृतार्थ होत. लवकरच त्यांनी श्री क्षेत्र काशीचा निरोप घेतला. ते श्री क्षेत्र प्रयागला त्यांचे तीन वर्षे वास्तव्य होते. या वास्तव्यात त्यांना अनेक शिष्य लाभले. यांपैकी सात जणांना त्यांनी विधियुक्त संन्यासदीक्षा दिली. माधवसरस्वती, बाळकृष्ण – सरस्वती, उपेंद्रसरस्वती, सदानंदसरस्वती, ज्ञानज्योतीसरस्वती, कृष्णसरस्वती, आणि सिद्धसरस्वती हे सात शिष्योत्तम होत.

मंजारिका नावाच्या गावी माधवारण्य नावाचे एक मुनी नृसिंहाचे उपासक होते. मानसपूजेत ध्यानाची जी मूर्ती ते पाहात होते, ती श्रीगुरूंचीच म्हणजे नृसिंहसरस्वतींचीच आहे हे ध्यानात येताच त्यांनी श्रीगुरूंना आपले सर्वस्व अर्पण केले. श्रीगुरूंनी त्यांना आत्मबोध केला. तेथून ते वासर ब्रह्मेश्वर नावाच्या क्षेत्रास आले. येथे गोदावरीच्या पात्रात स्नान करीत असताना त्यांना एक करुण दृश्य दिसले. एक ब्राह्मण पोटदुखीच्या विकाराने त्रस्त होऊन आत्महत्या करण्याच्या विचारात होता. श्रीगुरूंचे त्याच्याकडे लक्ष गेले व त्याला त्यांनी रोगमुक्तीचा उपाय सांगितला.

याच वेळी गंगास्नानास सायंदेव नावाचा एक ग्रामाधिकारी आला. त्याने श्रीगुरूंना मनोभावे वंदन केले. हा सायंदेव आपस्तंब शाखेचा कौडिण्य गोत्री असून कडगंचीचा रहाणारा, पण उदरभरणार्थ यवनांची सेवा करणारा होता. त्याचा भाव पाहून श्रीगुरू त्याला म्हणाले, ‘या ब्राह्मणास पोटदुखीचा विकार आहे. तू याला घरी घेऊन जा व पोटभर मिष्टान्न घाल. त्याची व्यथा दूर होईल.’ सायंदेवाने श्रीगुरूंनाही आमंत्रण दिले. श्रीगुरू सायंदेवाच्या घरी आले. त्याच्या पत्नीने, जाखाईने श्रीगुरूंची मनोभावे षोडषोपचार पूजा केली. ‘तुला अनेक पुत्र होती. तुझ्या घरात गुरुभक्ती वाढेल’ असा तिला आशीर्वाद मिळाला. ब्राह्मणाचा पोटदुखीचा विकारही संपला.

‘कृष्णसरस्वती’ नावाचे एक वृद्ध संन्यासी होते. ते केवळ ब्रह्मज्ञानी असून स्नेहभावाने सर्वांकडे पहात.

‘लोकानुग्रहकारणें । तुम्हीं आतां संन्यास घेणें । आम्हां समस्तां उद्धरणें । पूजा घेणें आम्हां करवी ॥’ (१२.९१)

या वृद्ध स्वामीची व इतरही संन्याशांची ही विनंती मान्य करून नरहरीने कृष्णसरस्वतींकडून संन्यासदीक्षा घेतली. नरहरीस कृष्णसरस्वती गुरू झाले. या कृष्णसरस्वतींची गुरुपीठिकाही अत्यंत थोर प्रकारची होती. आदिपीठाचे शंकर हे पहिले गुरू. त्यानंतर विष्णू, त्यानंतर ब्रह्मदेव हे मूळपीठ असून पुढे वसिष्ठ, शक्ती, पराशर, व्यास, शुक, गौडपादाचार्य, गोविंदाचार्य, शंकराचार्य, विश्वरूपाचार्य, ज्ञानबोधीगिरिय, सिंहगिरिय, ईश्वरतीर्थ, नृसिंहतीर्थ, विद्यातीर्थ, शिवतीर्थ, ज्ञानतीर्थ, मळियानंद, देवतीर्थसरस्वती, सरस्वतीयादवेन्द्र आणि शिष्य कृष्णसरस्वती असून त्यांचेकडून नरहरीने संन्यासदीक्षा स्वीकारली. श्रीनृसिंहसरस्वती असे नवे नाव नरहरीने धारण केले.

श्रीगुरूंचे तीर्थाटन 

उत्तरेकडील वास्तव्य संपवून ते सप्त शिष्यांसह दक्षिणेकडे वळले. निरनिराळ्या तीर्थांना त्यांनी भेटी दिल्या. तब्बल तीस वर्षांनी ते मार्गदर्शनार्थ स्वगृही करंजनगरला परतले. करंजग्रामातील लोकांनी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले. संन्यासी बनलेल्या अलौकिक बाळाच्या मंगल दर्शनाने माता-पिता कमालीचे आनंदित झाले. त्यांनी मातापित्याला प्रेमाने आलिंगन दिले. त्यावेळी उभयतांची काया तेजाळून ते खऱ्या सुखाचे अधिकारी बनले.

काही दिवस करंजपुरीत राहून ते लोकोद्धारासाठी पुनश्च बाहेर पडले. त्यांच्या भोवती भाविकांचा अक्षरश: गराडा असे. ते लोकांच्या आधिव्याधी हरण करीत. निपुत्रिकांना सुपुत्र देत. त्यांनी केलेल्या अभूतपूर्व चमत्कारांनी त्यांची कीर्ती सर्वत्र पसरली. अनेक पतितांचा, पाप्यांचा त्यांनी लीलया उद्धार केला. अनेकांना त्यांनी सन्मार्गाला लावले. वाढत जाणाऱ्या जनसंपर्कापासून थोडे दिवस दूर राहण्यासाठी ते वैजनाथ येथे एक वर्ष गुप्त राहिले. एकांतवासाचे सुख उपभोगू लागले. सेवेला सिद्धसरस्वती नावाचे शिष्य होते. श्रीगुरूंच्या गुप्त रहिवासात एक उत्कट जिज्ञासेचा ब्राह्मण त्यांच्या दर्शनासाठी आला; पण वर्षभर त्याला दर्शन झाले नाही. सिद्धसरस्वतींनी त्याला ‘गुरुचरित्र’ सांगितले. आजच्या लोकप्रिय गुरुचरित्राचा निम्मा भाग अशा रीतीने वैजनाथ येथे तयार झाला.

एका वर्षाच्या गुप्त अनुष्ठानानंतर श्री गुरूंचा पुनश्च अखंड संचार सुरू झाला. कृष्णातिरी भिलवडी येथील भुवनेश्वरी देवीसन्निध असलेल्या श्री क्षेत्र औदुंबरी त्यांनी एक चातुर्मास वास्तव्य केले. तिथून ते कृष्णा-पंचगंगा संगमावर राहिले. तिथे त्यांचे बारा वर्षे म्हणजे एक तप वास्तव्य होते. ‘मनोहर पादुका’ स्थापून त्यांनी त्या स्थानाचा निरोप घेतला.

तिथून ते भीमा-अमरजा संगमावर श्री क्षेत्र गाणगापूरला आले. तिथे त्यांचे तेवीस वर्षे वास्तव्य होते. या कालखंडात त्यांनी अनेकांचा उद्धार केला. श्री क्षेत्र गाणगापूर गुरुभक्तांची काशी ठरली. दत्तभक्तांची पंढरी झाली. श्री गुरूंची कीर्ती भारतभर पसरली. चहू दिशांतून लोक त्यांच्या दर्शनाला येऊ लागले. उत्तरोत्तर त्यांचा भक्तपरिवार वाढतच गेला.

श्रीगुरु औदुंबरतळीच का निवास करतात? याही प्रश्नाचे उत्तर श्रीगुरुचरित्राच्या एकोणिसाव्या अध्यायात आलेले आहे. नृसिंह अवताराच्या वेळी हिरण्यकशिपूच्या उदरविदारणामुळे भगवंताच्या हातांची, नखांची आग होत राहिली; ती उंबराच्या फळात हात खुपसल्यावर शमली. म्हणून शीतल उपचारांचे प्रतीक म्हणून औदुंबराची ख्याती श्रीगुरूंच्या संदर्भात झाली. अमरेश्वराजवळच्या चौसष्ट योगिनी श्रीगुरूंची पूजा करण्यासाठी माध्यान्ह समयी येत. येथेच गंगानुजावर कृपा करून श्रीगुरूंनी त्याचेही दैन्य हरण केले. औदुंबर हा कल्पवृक्ष आहे; आपल्या मनोहर पादुकाही तेथेच आहेत, तुम्ही तेथेच वास करावा असे सांगून श्रीगुरू भीमातीरी असलेल्या गाणगापूर या गावी येऊन स्थिरावले.

श्रीक्षेत्र गाणगापुरातील लीला 

गाणगापुर येथे श्रीगुरूंनी जवळजवळ तेवीस वर्षे वास्तव्य करून दीनदु:खितांचा उद्धार केला असल्याने गाणगापुरास दत्तपंथीयांत फारच महत्त्वाचे स्थान मिळाले आहे. या स्थानाचे माहात्म्य श्रीगुरुचरित्रात वर्णन करताना म्हटले आहे,

‘भीमा उत्तरवाहिनीसी । अमरजा संगम विशेषी । अश्वत्यवृक्ष परियेसीं । महास्थान वरदभूमी ॥ अमरानदी तीर्थ थोर । संगम जाहला भीमातीर । प्रयागसमान असे क्षेत्र । अष्टतीर्थें असती तेथें ॥’ (२२.११-१२)

अशा या गाणगापुरात राहून श्रीगुरूंनी अनेक लीला प्रकट करून भक्तजनांचा उद्धार केला. या गावाच्या एका ब्राह्मणाच्या वंध्या म्हशीचे दूध पिऊन श्रीगुरू संतुष्ट झाले. त्यांनी त्याचे दारिद्र्यही दूर केले. तेथील एका ब्रह्मराक्षसाचाही त्यांनी उद्धार केला. शेजारीच कुमशी नावाच्या गावात त्रिविक्रमभारती नावाचा एक तापसी राहात असे. त्याने गाणगापूर येथील श्रीगुरूंच्या चमत्कारांची निंदा केली. दांभिक संन्यासी म्हणून त्यांची त्याने थट्टाही केली. त्यास जाणीव देण्यासाठी ते कुमशीस निघाले. त्रिविक्रमभारती नरसिंहाचे उपासक असून त्याच्याच मानसपूजेत व्यग्र होते. त्यांना नरसिंहाच्या ऐवजी एका दंडधारी पुरुषाचेच दर्शन होत राहिले. खरा प्रकार त्रिविक्रमाच्या ध्यानी आला व तो श्रीगुरुंना शरण गेला. अनेक प्रकारे त्याने श्रीगुरूंची स्तुती केली.

श्रीपाद अवतारीच्या वरदानानुसार एक रजक आता वैदुरी अथवा बिदर नगरीत म्लेच्छ जातीत जन्मास येऊन बादशहा झाला होता. पूर्वसंस्कारामुळे त्याच्या मनात हिंदूंबद्द्ल द्वेष नव्हता. ब्राह्मणांचा तो सन्मान करी. विप्रांच्या देवालयांचा तो मान राखी. एक दिवशी या राजाच्या मांडीस एक फोड झाला. कोणत्याही उपायाने तो बरा होईना. त्याला फारच यातना सहन कराव्या लागत होत्या. सत्पुरुषाची सेवा केल्यास हा फोड बरा होईल अशी त्याची खात्री झाली. गाणगापुरास एक यती सत्पुरुष असल्याचे त्याला समजले. त्याने गाणगापुरास जाऊन श्रीगुरूंचे दर्शन घेतले. ‘का रे रजका कोठे असतोस ? आमचा दास असूनही फार दिवसांनी भेटलास ?’ असे श्रीगुरूंनी म्हणताच म्लेछ राजास पूर्व जन्माचे स्मरण झाले. श्रीगुरूंना त्याने साष्टांग नमस्कार केला. श्रीगुरूंच्या कृपेने त्याचा फोड पूर्णपणे बरा झाला.

सिंहस्थाच्या निमित्ताने श्रीगुरू नाशिक-त्र्यंबकेश्वराच्या यात्रेस निघाले. गौतमीत स्नान करून ते गाणगापुरास आले. परंतु या वेळी त्यांच्या मनात भलतीच कालवाकालव होत होती.

‘प्रगट झाली बहुख्याति । आतां रहावें गौप्य आम्ही ॥’ (५०.२५४)

असा विचार शिष्यांना बोलून दाखवून आणखी ते म्हणाले,

‘यात्रारूपें श्रीपर्वतासी । निघालों आतां परियेसीं । प्रगट बोल ह्याचि स्वभावेंसीं । गौप्यरूपें राहूं येथेंचि ॥ स्थान आमुचें गाणगापुर । येथुनि न वचों निर्धार। लौकिकमतें अवधारा । बोल करितों श्रीशैलयात्रा ।’ (५०.२५५ – ५६)

निरवानिरव करण्याच्या भाषेत ते म्हणाले,

‘प्रगट निघों यात्रेसी । वास निरंतर गाणगाभुवनासी । भक्तजन तारावयासी । राहूं आम्ही निरंतर । कठीण दिवस युगधर्म । म्लेच्छ राज्य क्रूरकर्म । प्रगट असतां घडे अधर्म । समस्त म्लेच्छा येथें येती । राजा आला म्हणोनि । ऐकिलें जाती यवनीं।’

कृष्णसरस्वती, उपेन्द्रसरस्वती, सदानंदसरस्वती, ज्ञानज्योतिसरस्वती, सिद्धसरस्वती इत्यादी आणखी काही शिष्यांचा निर्देश मार्गे केलेला आहेच. सिद्धसरस्वतीस श्रीगुरूंचा सहवास पुष्कळच असून तोच त्यांच्या निजानंदगमनापर्यंत सान्निध्यात होता. यानेच श्रीगुरूंचे संस्कृत चरित्र तयार केले असावे व या संस्कृत चरित्राच्या आधाराने सिद्धनामधारकसंवादाच्या रूपाने पुढे सरस्वती गंगाधराने विख्यात असा ‘श्रीगुरुचरित्र’ नावाचा मराठी ग्रंथ लिहिला. नामधारक म्हणजे स्वत: सरस्वती गंगाधर व सिद्ध म्हणजे सिद्धसरस्वती असे मानावयास हरकत नाही.

श्रीगुरु नृसिंहसरस्वतींच्या काळासंबंधाने मतभेद आहेत. शके १३८० म्हणजे सन १४५८ हा सर्वसामान्य असणारा त्यांचा निजानंदगमनकाल कायम केला व श्रीगुरूंचे आयुर्मान ऐंशी वर्षांचे मानले तर त्यांचा जन्म अंदाजे शके १३०० म्हणजे सन १३७८ असा येतो. श्रीनृसिंहसरस्वतींनी आपल्या दीर्घ आयुष्यात प्रतिकूल परिस्थितीत लोकरक्षणाचे व धर्मसंस्थापनेचे फार मोठे कार्य केले आहे. नृसिंहवाडी व गाणगापूर या जुन्या तीर्थांना नवा उजाळा देऊन त्यांनी त्यांचे माहात्म्य वाढविले. लोकांना सन्मार्ग दाखविला.

सकळ येतील मनकामनी । म्हणोनि गौप्य राहों आतां ॥ …पुढें येतील दुर्दिन । कारण राज्य यवन । समस्त येतील करावया भजन । म्हणोनि गौप्य राहों आतां ॥’ (५०.२५७-६१)

याप्रमाणे निरोप घेऊन श्रीगुरू पर्वतयात्रेस म्हणजे श्रीशैल्यपर्वताला निघाले. भक्तजनांच्या अंत:करणास फारच वेदना झाल्या. त्यांनी श्रीगुरूंच्या चरणांची मनोभावे पुन:पुन: प्रार्थना केली.

‘तू भक्तजनांची कामधेनु । होतासी आमुचा निधानु । आम्हां बाळकां सोडून । जातां म्हणोनि विनविताती । नित्य तुझें दर्शनीं । दुरितें जातीं पळोनि । जे जे आमुची कामना मनीं । त्वरित पावे स्वामिया ॥ बाळकांतें सोडूनि माता । केंवि जाय अव्हेरिता । तूंचि आमुचा मातापिता । नको अव्हेरू म्हणताति ॥’ (५१.१०-१२)

शोक करणाऱ्या शिष्यांचे श्रीगुरूंनी परोपरीने सांत्वन केले. आम्ही या गाणगापुरातच आहोत असे त्यांनी पटवून दिले.

‘प्रात:स्नान कृष्णातीरीं । पंचनदी संगम औदुंबरी । अनुष्ठान बरवें त्या क्षेत्रीं । माध्यान्हीं येतों भीमातटीं ॥ संगमी स्नान करोनि । पूजा घेऊं मठी निर्गुणी ॥ चिंता न करा अंत:करणीं ॥’ (५१.१६-१७)

असे त्यांनी समजविले. ‘अश्वत्थ नव्हे कल्पवृक्ष । संगमी असे प्रत्यक्ष । जें जें तुमच्या मनीं अपेक्ष । त्वरित साध्य पूजितां ॥ कल्पवृक्षातें पूजोन। यावे आमुचें जेथ स्थान । पादुका ठेवितों निर्गुण । पूजा करावी मनोभावें ॥’ (५१.२०-२१)

असे सांत्वन करून श्रीगुरू श्रीपर्वताकडे आले. सांगितल्याप्रमाणे शेवंती, कमळ, कल्हार, मालती इत्यादी पुष्पांचे एक सुरेखसे आसन शिष्यांनी कर्दळीपानावर तयार केले. गंगेच्या पात्रावर आसन ठेवून होताच श्रीगुरूंनी शिष्यांना परत जाण्यास सांगितले. आपल्या भक्तांचे सांत्वन करून

‘उठले श्रीगुरु तेथूनि ।पुष्पासनीं बैसोनि । निरोप देती भक्तांसी ॥ ‘कन्यागती’ बृहस्पतीसी । ‘बहुधान्य’ नाम संवत्सरेसी । सूर्य चाले ‘उत्तर दिगंते’ सी । संक्रांति ‘कुंभ’ परियेसा ॥ ‘शिशिरऋतु’ माघ मासीं । ‘असित’ पक्ष ‘प्रतिपदेंसी’ । ‘शुक्रवारी’ पुण्यदिवशी । श्रीगुरू बैसले निजानंदी ॥’  (५१.३५-३७)

जाताना त्यांनी ‘गायनीं करावें माझें स्मरण । त्यांचे घरीं असें जाण । गायनीं प्रीति बहु मज ।’ (५१.४०) अशी सूचना दिली. थोड्याच वेळाने त्यांची प्रसादपुष्पेही शिष्यांसाठी आली. ती सायंदेव, नंदी, नरहरी व सिद्ध या चार शिष्यांनी वाटून घेतली.

श्रीनृसिंहसरस्वतींच्या चरित्राचे व कार्याचे समालोचन करण्यापूर्वीच ढेरे यांनी लिहिले आहे; ‘तेराव्या शतकाच्या अखेरीपर्यंत दत्तोपासनेचा जो पुराणप्रवाह वाहत आला होता, त्यात जीवन ओतण्याचे कार्य श्रीनरसिंहसरस्वतींनी केले. त्यांचे जीवनकार्य केवळ दत्तोपासनेच्या क्षेत्रातच नव्हे, तर समग्र महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनात दीपस्तंभासारखे मार्गदर्शक ठरले आहे. त्यांच्या जीवनकाळात जी संघर्षमय परिस्थिती निर्माण झाली होती त्या परिस्थितीच्या गर्भातूनच महापुरुषांच्या उदयाचा हुंकार ऐकू येत होता. त्या काळात एका आक्रमणशील संस्कृतीने हिंदू परंपरेचा ग्रास घेण्यासाठी महाराष्ट्रात सर्वत्र संचार चालविला होता. त्या संकटातून महाराष्ट्राला मुक्त करण्याचे महान्‍ कार्य श्रीनृरसिंहसरस्वतींनी केले.’

श्री गुरूंच्या वास्तव्याने पुनीत तीर्थक्षेत्रे 

श्री क्षेत्र औदुंबर श्री नृसिंह सरस्वतींच्या प्रमुख स्थानांपैकी एक असून ते अत्यंत जागृत स्थान आहे. हे निसर्गरम्य तीर्थक्षेत्र सांगली जिल्ह्यात आहे. कृष्णेचा अथांग पण शांत डोह, दक्षिणवाहिनी पुण्यसलिला कृष्णा, तिच्या उभय काठांवरील नेत्रसुखद, प्रसन्न, सदारहित मळे, पश्चिम तीरावरील सुबकसा प्रसन्न घाट, वर औंदुबर वृक्षांची मनोहर राई आणि त्यात लपलेले छोटेसे पण अत्यंत सुबक असे श्री दत्तमंदिर, श्री मंदिरात असंख्य भक्तांची माउली असलेल्या श्रीदत्तगुरूंच्या विमल, पावन पादुका, श्री मंदिराच्या वरच्या बाजूस सभोवताली वड, पिंपळ, चिंच व लिंब यांची दाट झाडी व दाटीने थाटलेली पुजाऱ्यांची पाच-पंचवीस घरे असे हे सुंदर निसर्गरम्य औदुंबर क्षेत्र आहे.

‘धन्य कृष्णातीर । धन्य औदुंबर । जेथे गुरूवर । वसतसे ॥’ (जनार्दन स्वामी)

श्री क्षेत्र नरसोबावाडी ही तर श्री ‘दत्तप्रभूंची राजधानी’ च म्हणून प्रसिद्ध आहे. श्रीमत्‍ वासुदेवानंद सरस्वती टेंब्येस्वामी महाराज म्हणतात –

“नरसोबावाडी जे लोकमान्या । कृष्णातीरी शोभवी जे धन्या ॥

अन्या तैसी देखीली म्या न साची । श्री दत्ताची राजधानी सुखाची ॥”

श्री नृसिंह सरस्वतींनी या ठिकाणी बारा वर्षे तपश्चर्या केली. या ठिकाणी त्यांनी अनेक लीला केल्या. म्हणूनच त्यांच्या नावावरून या स्थानाला ‘नृसिंहवाडी’ किंवा ‘नरसोबावाडी’ असे नाव पडले. श्री क्षेत्र नरसोबावाडी म्हणजे दत्तभक्तांचे हृदयच! हे तीर्थक्षेत्र म्हणजे भूत, प्रेत, पिशाच्चांचे कर्दनकाळच ठरलेले आहे. लाखो भक्तांनी इथे प्रापंचिक आणि पारमार्थिक उन्नयन करून घेतले आहे.

या स्थानाचे माहात्म्य सांगताना श्री शंकर स्वामी म्हणतात –

‘दारिद्र्यासि धन, आरोग्य मिळे, रोग असे त्याजला । टळे अपमृत्युनि तो या स्थळा ॥

कुष्ठि, अपस्मारी, अंध, बहिरे, हृदयशूळि पांगळे । मंदमती मूक होती चांगले ॥

धर्म, अर्थ, काम, मोक्ष चारी पुरुषार्थ आगळे । या स्थळी तेही लाभती सगळे ॥

श्री गुरूपादुंकार्चनी फळ सौख्य समृद्धी मिळे । दैन्य, अघ, तापत्रय मावळे ॥’

अवतार समाप्ती 

प्रदीर्घ काळ भक्तकार्य करून श्री नृसिंहसरस्वती अवतार समाप्तीची भाषा बोलू लागले. भीमा-अमरजा संगम हा गंगायमुनांचा संगम आहे. इथे नित्य स्नान करा. सत्त्वस्थ भक्ताला कल्पवृक्षाप्रमाणे फळ देणाऱ्या इथल्या अश्वत्थाची नित्य पूजा करा. ‘या कल्पतरूच्या छायेत जो उपासना करील तो कृतार्थ होईल’, अशी अभय वाणी उच्चारून ते महाप्रस्थानास सिद्ध झाले.

श्री सद्‍गुरू नृसिंह सरस्वतींच्या आज्ञेप्रमाणे निर्वाणाची तयारी करण्यात आली. केळीच्या पानांवर फुलांचे आसन रचण्यात आले. गुरुनामाच्या घोषात ते आसन नदीच्या पाण्यात ठेवण्यात आले. श्री गुरूदेवांनी त्यावर आरोहण केले. सर्व शिष्यांचे, भक्तांचे अभिवादन स्वीकारून ते प्रवाहाच्या दिशेने मार्गस्थ झाले. मार्गस्थ होताना त्यांनी ‘सुखधामी गेल्यानंतर चार पुष्पे प्रसाद म्हणून पाठवून देतो.’ असे सांगितले त्याप्रमाणे पुष्पे प्रसाद म्हणून परत आली. ज्या काळात महाराष्ट्राची वाटचाल घनांधकारातून चालू होती, त्या काळात श्री नृसिंह सरस्वतींचे जीवनकार्य पथप्रदर्शक प्रखर ज्योतीसारखे कल्याणकारक ठरले. महाराष्ट्रभूमीला भक्तीचा, मुक्तीचा मार्ग दाखविणारा हा महापुरुष मराठी संस्कृतीच्या इतिहासात ‘युगपुरुष’ म्हणून चिरंतन राहील.

या भक्तिचंद्राला, धर्मसूर्याला भक्तिभावपूर्वक कोटी कोटी प्रणिपात!

श्रीगुरूंच्या लीला व भक्तांचा उद्धार

गुरुचरित्राच्या बाविसाव्या अध्यायात गुरुमहाराजांनी एका दरिद्री ब्राह्मणाघरी भिक्षा मागितल्याची कथा आहे, माध्यान्ह काळी महाराज त्या घरी भिक्षेला गेले तेव्हा केवळ गृहस्वामिनी घरी होती. महाराज भिक्षेला आलेले पहाताच ती पुढे आली व म्हणाली गृहस्वामी भिक्षेकरिता गेले आहेत ते येईस्तोवर थांबावे. त्या घरी एक म्हैस महाराजांना दिसली, त्यावर गुरुमहाराज म्हणाले हि म्हैस येथे आहे तिचे दूध का आम्हास देत नाहीस? त्यावर ती स्त्री म्हणाली म्हैस वांझ आणि दंतहीन आहे. तिचा उपयोग आम्ही मृत्तिका वाहण्याकरिता करतो. आज कोणी नेण्याकरिता आले नाही म्हणून ती येथे आहे. त्यावर गुरुमहाराज म्हणाले, तिचे दूध काढून आम्हास द्यावे, गुरुवाक्य प्रमाण मानून तिने दूध काढले आणि आश्चर्य (चमत्कार) म्हणजे ती म्हैस दूध देती झाली. त्या स्त्रीने दूध तापविले आणि गुरुमहाराजांना प्यावयास दिले. गुरुमहाराज दारिद्र्य नष्ट झाले असे म्हणून आशीर्वाद देऊन तेथून निघाले. या कथेत केवळ त्या ब्राह्मणावर कृपा केली असे नाही तर त्या म्हशीवर महाराजांनी दोन प्रकारे कृपा केली. इह आणि पर. इह म्हणजे तिचे अत्यंत कष्टदायक असे भोग संपवले. आणि पर म्हणजे प्रत्यक्ष गुरुमहाराजांचे दर्शन आणि सान्निध्य ज्या प्राण्याला मिळाले तो तरुन जाणार नाही काय?

आदी श्रीगुरुपरंपरा 

श्री शंकर-श्री विष्ण-श्री ब्रह्मा-श्री वसिष्ठ-पराशर-व्यास

-शुक्र- गौडपादाचार्य-गोविंदाचार्य-शंकराचार्य-विस्वरूपचार्ये-ज्ञानबोधगिरी-सिहगिरी-ईश्वरतीर्थ-नृसिंहतिर्थ-देवतीर्थ-विद्यातीर्थ-शिवतीर्थ-भरतीतिर्थ-विद्यारण्य-विद्यातीर्थ-मालियानंद-देवतीर्थ-सरस्वती यादवेन्द्र-कृष्णा सरस्वती-श्रीगुरू नृसिहसरस्वती

 श्रीगुरूचरित्रात महत्व 

“अंतःकरण असता पवित्र| सदाकाळ वाचावे गुरूचरित्र”||

श्रीगुरुचरित्र ही कामधेनू आहे. तो कल्पतरू आहे. याच्या श्रवण-पठणाने अनेक फायदे होतात. या ग्रंथाच्या श्रवण-पठणाने गुरुकृपा प्राप्त होते. सर्व संकटाचा परिहार होतो. संततीसौख्य लाभते. महापातकांचा नाश होतो .प्रयत्नांना यश येते. आरोग्यप्राप्ती होते. विद्याध्यायनात प्रगती होते. साधूसंतांचा सहवास लाभतो. घरातील वादआवड नाहीसे होतात. चारी पुरूषार्थ प्राप्ती होते. संकटकाळी धैर्य येते मात्र त्यासाठी सदाचरण आणि श्रीगुरुवर नितांत श्रद्धा आणि भक्ती आवश्यक आहे. या ग्रंथाचा सर्व साधकांना आध्यात्मिक आणि सर्वतोपरीने लाभ व्हावा हीच श्रीदत्तगुरू चरणी प्रार्थना.

आणिक सांगेन एक खूण । गायनीं करी जो माझे स्मरण । त्याचे घरीं असे जाण । गायनप्रीति आम्हांसी ॥४०॥

नित्य जें जन गायन करिती । त्यांवरी माझी अतिप्रीति । तयांचे घरी अखंडिती । आपण असों अवधारा ॥४१॥

व्याधि न होय त्यांचे घरीं।दरिद्र जाय त्वरित दुरी।पुत्रपौत्र श्रियाकरीं । शतायुषी नांदतील

नोटः वर्षातून एकदा श्रीगुरूचरित्रात स्वतः करवे अथवा गुरूजी करून घ्यावे व प्रत्येक गुरुवार रात्री श्रीगुरू महाराजाची पंचपदी करावी व श्री क्षेत्र गाणगापुर येथे जाऊचन श्रीगुरू महाराजांचे दर्शन घ्यावे ही विनंती यांनी वास्तु मघ्ये जीवनामध्ये श्रीगुरू महाराजांच्या आशिर्वादाने काही कमी पडत नाही

श्री गुरूंच्या लीलाकथा श्रीगुरूचरित्रात आलेल्या आहेत. आजही श्री गुरु गाणगापुरातच आहेत. भक्तांना ते दर्शन देतात हे खरच…

श्रीगुरू महाराजांच्या जयंतीला श्रीगुरूचरित्रात पारायण करावे आणि या दिवशी अकरावा अध्याय वाचवा…..

श्री गुरुदेव दत्त

नमो सदा श्रीगुरू नृसिंहसरस्वती महाराज

ज्योतिष राहुल नारायणराव पुराणिक 

ज्योतिष आकाश नारायणराव पुराणिक

९८२३३१६१७९ 

जालना

Leave A Reply

Your email address will not be published.