मुंबई : राज्यात पुढच्या काही दिवसांमध्ये हवामान खात्याकडून पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. महाराष्ट्रात अवकाळी पावसाच्या भीतीने शेतकऱ्यांची चिंता वाढवली आहे. आधीच बिघडलेली आर्थिक स्थिती आणि त्यात आता अवकाळी पावसाने शेतीवर होणारा विपरित परिणाम यामुळे शेतकरी अडचणीत येण्याची शक्यता आहे. अनेक पिकांवर अवकाळी पावसाचा वाईट परिणा होतो आणि हाता तोंडाशी आलेला घास मातीमोल होतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी कमीतकमी नुकसान व्हावं यासाठी प्रयत्न सुरु केलेत.
राज्यात 18-21 मार्च 2021 दरम्यान मध्यम स्वरुपाचं पाऊस पडेल, असा अंदाज आहे. भारतीय हवामान खात्याने काही ठिकाणी विजा आणि गारपीटीची शक्यताही वर्तवली आहे. यामुळे शेतकऱ्यांनी याआधीच आपला शेतमाल जपून ठेवावा अश्याही सूचना हवामान खात्याकडून देण्यात आल्या आहेत.
अरबी समुद्राकडून येणारे बाष्पयुक्त वारे आणि दक्षिणेकडून येणारे वारे एकत्रित येणार असल्यानं होणाऱ्या आंतररक्रीयेच्या प्रभावामुळे पोषक स्थिती असल्याची माहिती पुणे वेधशाळेकडून देण्यात आली आहे. यामुळे 18 ते 21 या तीन दिवसात मध्य महाराष्ट्रासह, मराठवाड्यात काही ठिकाणी जोरदार पाऊस तर विदर्भात काही ठिकाणी गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे.
देशात महाराष्ट्रासह मध्ये प्रदेशमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भात तर वादळी वाऱ्याचा पाऊस होण्याची शक्यता आहे. हवामान तज्ज्ञ के. एस. होसाळीकर यांनी ट्विट करत हवामानाचा अंदाज व्यक्त केला आहे. होसाळीकर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं की, “हवामानातील बदलामुळे विदर्भासह मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात 18-21 मार्च दरम्यान वादळी वाऱ्यासह पाऊसाची शक्यता आहे.”
कुठे आहे पावसाची शक्यता?
– पुण्यासह नजिकच्या शहरांमध्ये
– मध्य महाराष्ट्रात नाशिक, जळगाव
– मराठवाड्यात औरंगाबाद, जालना, परभणी बीड
– विदर्भात नागपूर, अकोला, अमरावती, बुलढाणा, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया
– कोकणातील रत्नागिरी आणि रायगड इथंही पावसाची शक्यता