शेतकर्‍यांना रेल्वे देणार फळ-भाजीपाला वाहतुकीवर ५० टक्के सवलत

0

नवी दिल्ली : शेतकर्‍यांना मदत करण्याच्या दृष्टीने भारतीय रेल्वे महत्त्वपूर्ण पावले उचलत असून त्यानुसार फळे आणि भाजीपाला वाहतुकीवर आता ‘किसान रेल’मध्ये सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ५० टक्के अनुदान ‘किसान रेल’मध्ये फळे आणि भाजीपाल्यांच्या वाहतुकीत देण्यात येईल, असे रेल्वे मंत्रालयाने म्हटले आहे.

 

‘किसान रेल’मार्फत फळे आणि भाजीपाल्यांच्या वाहतुकीवर ५० टक्के अनुदान देण्याचे आदेश केंद्र सरकारने मंगळवारी दिले आहेत. ग्रीन-टॉप टू टोटल (Operation Green-TOP to Total) योजनेंतर्गत हे अनुदान दिले जाईल, अशी माहिती रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी दिली. तसेच भाजीपाला आणि फळांच्या ‘किसान रेल’द्वारे ट्रान्सपोर्ट करणारे अनुदान ५० टक्के करण्यात आले आहे. शेतकरी आता कमी किंमतीत आपले उत्पादन नवीन बाजारात पाठवू शकतील. ज्यामुळे त्यांचे उत्पन्न वाढेल, असे रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी सांगितले.

 

यासंदर्भातील वृत वृत्तसंस्था पीटीआयने दिले असून त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार, अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाने केंद्राच्या आत्मनिर्भर भारत मोहिमेचा एक भाग म्हणून प्रायोगिक तत्वावर सहा महिन्यांसाठी ऑपरेशन ग्रीन योजनेचा विस्तार करून टोमॅटो, कांदे आणि बटाटे (उत्कृष्ट) पासून सर्व फळे आणि भाज्या (सर्व) यामध्ये आणण्याची घोषणा केली होती. मे महिन्यात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी घोषणा केली होती की, ‘ऑपरेशन ग्रीन’चा 500 कोटींच्या अतिरिक्त निधीसोबत विस्तार केला जाईल. यामध्ये टोमॅटो, कांदे आणि बटाटे याशिवाय सर्व फळे आणि भाज्यांचा समावेश असेल.

 

दरम्यान, आपल्या आदेशात रेल्वे मंत्रालयाने म्हटले आहे की, भारतीय रेल्वे हा निधी वापरल्यानंतर अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाला (MOFPI) उपयोगिता प्रमाणपत्र उपलब्ध करून देईल. त्यानंतर मंत्रालय रेल्वेला अतिरिक्त निधी देईल. त्यामुळे झोनल रेल्वेकडून ‘किसान रेल’द्वारे वाहतूक केल्या जाणाऱ्या फळ व भाजीपाल्यांवर तात्काळ परिणाम म्हणून ५० टक्क्यांपर्यंत अनुदान देण्यास सांगण्यात आले आहे. दरम्यान, यंदाच्या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात ‘किसान रेल’ ही विशेष पार्सल ट्रेन जाहीर करण्यात आली आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.