शेंदुर्णी नगरपंचायत तर्फे निर्माल्यातून होणार खत निर्मिती

0

शेंदुर्णी ता.जामनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क 

दहा दिवस गणेशाची आराधना केल्यानंतर आज भावपूर्ण वातावरणात आणि अतिशय साध्या व पारंपारिक पद्धतीने गणपती बाप्पाला निरोप देण्यात आला. सण-सणावारांमध्ये ‘निर्माल्य ’नद्यांमध्ये, तलावांमध्ये सोडले जाते. ज्यामुळे फार मोठ्या  प्रमाणात जलप्रदूषण होते. हे जलप्रदूषण रोखण्याचा साधा आणि सोपा मार्ग म्हणजे निर्माल्यापासून ’कंपोस्ट खत’ तयार करणे होय.

नदी प्रदूषण रोखण्यासाठी हाती घेतलेल्या निर्माल्य संकलन  चळवळीला शहरात चांगलाच प्रतिसाद मिळाला. गणपती विसर्जनावेळी भरपूर प्रमाणात निर्माल्य जमा  झाले आहे. निर्माल्यासोबत नागरिकांच्या भावना जडलेल्या असल्यामुळे त्याचे पावित्र्य राखणे गरजेचे असते. अनेकदा गणेशमूर्तीचे विसर्जन करताना सोबत आणलेले हार, फुले असे निर्माल्य भाविक पाण्यात टाकतात. यामुळे तलावांचे, नद्यांचे जलप्रदूषण होत असते. हे जलप्रदूषण टाळण्यासाठी शहरात न. प मार्फत उभारण्यात आलेल्या निर्माल्य संकलन वाहनातून जमा झालेल्या निर्माल्यावर नैसर्गिक प्रक्रिया करण्यात येणार आहे.

यंदा प्रथमच हे निर्माल्य उपयोगी आणण्याचा नगरपंचायतचा  प्रयत्न आहे. त्याकरिता निर्माल्यापासून खतनिर्मितीचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी शेंदुर्णीच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाच्या ठिकाणी स्वतंत्र प्रक्रिया केंद्र तयार करण्यात आले असून  तिथे निर्माल्यावर शास्त्रोक्त पध्दतीने प्रक्रिया म्हणजेच खत तयार  केले  जाणार आहे. अशी संकल्पना मुख्याधिकारी  साजिद पिंजारी यांनी मांडली.

या खताचा उपयोग माझी वसुंधरा अंतर्गत भविष्यात लावण्यात येणाऱ्या वृक्षारोपणासाठी जीवामृत म्हणून फायदेशीर ठरणार आहे. या खत निर्मिती उपक्रमाचे सर्व स्तरातून स्वागत करण्यात येत आहे. जास्तीत जास्त लोकांमध्ये या विषया संदर्भात जनजागृती व्हावी म्हणून नगरपंचायतच्या वतीने ध्वनीक्षेपक व सोशल मीडियाच्या माध्यमातून शहरातील विविध भागांमध्ये निर्माल्य संकलन वाहन फिरवले गेले. अशी माहिती नगराध्यक्षा सौ. विजयाताई खलसे यांनी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.