इस्लामाबाद :- पुलवामा येथे १४ फेब्रुवारी रोजी दहशतवाद्यांनी सीआरपीफच्या ताफ्यावर केलेल्या हल्ल्यानंतर भारताकडून प्रत्युत्तराची कारवाई होऊ शकते, त्यामुळे पाकिस्तान पार बिथरुन गेला आहे. पाकिस्तानी पंतप्रधानांच्या कार्यालयाकडून एक निवेदन प्रसिद्ध करण्यात आले आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी शांततेची एक संधी द्यावी, असे पंतप्रधान नरेंद्र मोदींना आवाहन केले आहे. आपण आपल्या शब्दावर ठाम असून भारताने पुलवामा हल्ल्यासंबंधी ठोस पुरावे दिले तर तात्काळ कारवाई करु असे इम्रान खान यांनी म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजस्थानमधील सभेनंतर इम्रान खान यांनी शांततेची संधी देण्याचे आवाहन केले आहे. दहशतवादाविरुद्ध संपूर्ण जगात एकमत आहे. पुलवामा कटाच्या सूत्रधारांना सोडणार नाही. यावेळी सर्वांचा हिशोब चुकता केला जाईल. सैन्य, सरकारवर विश्वास आहे. हा बदलेला भारत असून दहशतवादामुळे ज्या वेदना होत आहे त्या अजिबात सहन करणार नाही. दहशतवादाला कसे चिरडायचे ते आम्हाला चांगले कळते असे मोदी म्हणाले होते.