पुढचे दोन दिवस अतिवृष्टीचा इशारा
मुंबई : मुंबईसह उपनगरात रात्रीपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. रात्री झालेल्या पावसामुळे सखल भागांमध्ये पाणी साचले आहे. यादरम्यान, हवामान विभागाकडून पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. सायन-माटुंगा या रेल्वे मार्गावर पाणी साचल्यामुळे दादर ते कुर्ला दरम्यानची वाहतूक सध्या धीम्या गतीने सुरू आहे. मुसळधार पावसामुळे दादरच्या हिंदमाता आणि सायन परिसरात पाणीच पाणी झालं असून वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे
नवी मुंबई, ठाणे, दादर, सायन, कुर्ला, माटुंगा, अंधेरी, हिंदमाता आणि लालबागमध्ये मध्यरात्रीपासून संततधार सुरूच आहे. सायन रेल्वे ट्रॅकवर पावसाचे पाणी साचले आहे. गुघड्याभर साचलेल्या पाण्यातून वाट काढताना नागरिकांना कसरत करावी लागत आहे.
पोषक स्थितीमुळे सध्या राज्याच्या विविध भागांमध्ये पावसाने हजेरी लावली आहे. पुढील चार दिवस राज्यात बहुतांश ठिकाणी पाऊस पडणार आहे. २४ आणि २५ जुलैला कोकण विभागातील मुंबईसह इतर काही ठिकाणी अतिवृष्टी, तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस होणार असल्याचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. मराठवाडा आणि विदर्भातही पुढील चार दिवसांत पावसाची शक्यता आहे.