नवी दिल्ली : सर्वासमावेशक माहिती पुरवणारे लोकप्रिय संकेतस्थळ विकीपीडियाने मोदी सरकारला पत्र लिहून नव्या नियमांबाबत चिंता व्यक्त केली आहे. सरकारच्या नव्या नियमांमुळे आमच्या सिस्टिमचे पूर्णतः वाटोळे होईल, अशा आशयाचे पत्र विकीपीडियाने केंद्रीय दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांना पाठविले आहे.
विकीपीडियाचा कारभार पाहणाऱ्या “विकीमीडिया फाउंडेशन’ने लिहिलेल्या पत्रात, नव्या फिल्टरिंग नीतिचा परिणाम संपूर्ण वेबसाइटवर पडेल. भारत सरकारकडून उत्तरदायित्वाच्या नियमात बदल करण्याची तयारी सुरू आहे. पण हा चिंतेचा विषय आहे. यामुळे युजर्स बेस्ड वेबसाइटला नियंत्रित केले जाईल आणि त्याचा कंटेंटवर परिणाम होईल, असे नमुद केले आहे.
नियम बदलल्यास त्याचा थेट परिणाम विकीपीडियावर पडेल, कारण आमची कार्यपद्धती सर्वांसाठी पूर्णतः खुली आहे. आम्ही इंटरनेटवर अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं पालन करतो आणि केवळ युजर्स आमचं कंटेंट तयार करतात. त्यामुळे जर युजर्सकडील माहिती रोखली तर आमचं मॉडल फसेल, असे पत्रात म्हटले आहे.
विकीपीडियामध्ये केलेले बदल केवळ एका देशात दिसणार आणि अन्य देशांमध्ये दिसणार नाही, असे शक्य नाही. माहितीला चाळणी लावल्यास विकीपीडियाचे स्वरुप संपूर्ण जगात बदलेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.