पाचोरा:- पाचोरा तालुक्यात जंगलातील पाझर तलाव, वनविभागाचे तळे आटल्याने वन्य प्राण्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत होती वनविभागाने तातडीने पानवठे तयार करून पाणवठ्यात दर आठवड्याला टॅंकरने पाणी टाकून प्राण्यांना पिण्यासाठी पाणी पुरविले जात आहेत. या शिवाय शेंदुर्णी येथील सामाजिक संस्थांचे पदाधिकार्यांनी पुढे येवुन मोफत पाणी पुरवठा करण्यास सुरुवात केली आहे. वनक्षेत्रपाल ज्ञानेश्वर देसाई, वनपाल एस. पी. भिलावे, वनरक्षक जगदिश ठाकरे, पी. एन. महाजन, श्रावण पाटील सह अन्य कर्मचारी वन्य प्राण्यांना पिण्यासाठी पाणी पुरवित आहे. गेल्या तीन वर्षांपूर्वी पाण्या अभावी मोरांसह अनेक वन्य प्राण्यांचा पाण्या अभावी मृत्यू झाला होता.
पाचोरा तालुक्यातील नांद्रा, आसनखेडा, व जामनेर तालुक्यातील मावखेडा वनपरिक्षेत्रात बिबट्या, निलगाय, परीट, हरीण, ससे, रानडूकरे, तडस, याप्राण्यांसह मोर व अन्य पशूपक्षांचा मोठ्या प्रमाणात वावर आहे. या वर्षी अत्यल्प पावसाळा झाल्याने वन्यप्राण्यांसाठी जंगलात पाणी नसल्याने वन्यप्राणी पिण्याचे पाणी शोधण्यासाठी मोकळ्या जागेत प्रवास करीत असतात. यामुळे भररत्यावर आल्याने प्राण्यांचा भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहनांमुळे मृत्यू झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. तर अनेक ठिकाणी शेतात व गावात प्राण्यांचा शिरकावा झाल्याने नागरीकांमधे भितीचे वातावरण निर्माण होते. यामुळे वनविभागातर्फे नांद्रा, आसनखेडा, मालखेडा परीसरात सुमारे १००० ते १५०० लिटर पाणी मावेल अशा पद्धतीचे पाणवठे तयार करण्यात आले असुन यातील पाणी संपण्या आगोदर टॅंकरने पाणी टाकले जात आहे. चांगला पावसाळा होई पर्यंत पाणवठ्यात पाणी टाकून प्राण्यांना पिण्यासाठी पाणी पूरविले जाणार असल्याचे वनक्षेत्रपाल ज्ञानेश्वर देसाई यांनी सांगितले.
वन्य प्राण्यांसाठी सरसावल्या अनेक व्यक्ति
जंगलात वन्य प्राण्यांना पिण्यासाठी पाणी नसल्याने सामाजिक संस्थांसह अनेक व्यक्ती पुढे येऊन टॅंकर व्दारे पाणवठ्यात मोफत पाणी पुरवठा करीत आहेत यात शेंदुर्णी येथील प्राणी मित्र प्रविण कापूरे हे गावातील दानशूर व्यक्तींनी प्राण्यांची पिण्याच्या पाण्याची समश्या पटवून देवून दानशूर व्यक्ती कडून मोफत पाणी मिळवत आहेत. याशिवाय वनपरीक्षेत्रातील अनेक शेतकरी आपल्या शेतातील विहीरीचे पाणी कुंड्यात टाकून प्राण्यांसाठी पाणी उपलब्ध करून देत आहेत.