भडगाव | प्रतिनिधी सागर महाजन
कोरोना विषाणू मुळे सर्वत्र लॉक डाऊन आहे. या मध्ये अत्यावश्यक सेवा वगळून सर्व बंद असल्याने विड्याचे, नागीण पान, फापडा, आकडा पान विकून आपला संसार चालवणारा नगरदेवळा येथील बागवान परिवार यांच्यावर “दुष्काळात तेरावा महिना” आला आहे. त्यांच्या हजारो रूपयांचे पाने खराब झाली, सडली असून फेकून देण्याची वेळ आली आहे.
या बाबत माहिती अशी की, देवी, देवता यांची पूजा करताना सत्यनारायण, दररोजची पूजा, पान टपरी वर लागणारे, दशक्रिया विधी, व इतर कामांसाठी लागणारे विड्याचे पान, नागिण चे पान, फापडा, आकडा पान, या पानाचा व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह चालवणारे नवरदेववळा ता. पाचोरा येथून 30 वर्षांपासून भडगाव येथे पाने विकण्यासाठी येत असलेल्या रशीद बागवान व त्यांचा मुलगा नासिर बागवान (मामु) यांनी काही दिवसांपूर्वी (लॉक डाऊन अगोदर) वीस हजार रुपयांचा बावीस टोकऱ्या (टोपली) माल भरला होता. या नंतर कोरोणाचा प्रादुर्भाव वाढल्याने शनिवार पासून भडगावात लॉक डाऊन झाल्याने सर्व कामे थांबली. कुणीही खेड्या पाड्या वरून येत नाही व खरेदीही कोणी करत नाही म्हणून सर्व पाने ही खराब झाली, सडली, त्यामुळे फेकावी लागली आहे. या मुळे नुकसान झाले असून परिवाराचा उदरनिर्वाह चालवणे जिकरीचे झाले असल्याचे पान व्यवसाईक नासिर बागवान यांनी दैनिक लोकशाही शी बोलताना दिली.