नवी दिल्ली :- काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या भारतीय नागरिकत्वावर प्रश्न उपस्थित करणारी याचिका आज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. त्यामुळे राहुल गांधी यांना मोठा दिलासा मिळाला आहे. राहुल गांधी यांना निवडणूक लढण्यास बंदी करावी अशी मागणी या याचिकेत करण्यात आली होती. राहुल गांधी हे ब्रिटिश नागरिक असल्याचा आरोप भाजपाकडून करण्यात आला होता.
दरम्यान, मुख्य न्यायाधीश रंजन गोगई यांनी याचिकेवर सुनावणी करताना याचिकाकर्त्यांना चांगलेच फटकारले. कोणतीही कंपनीने राहुल गांधींना फॉर्मवर ब्रिटिश नागरिक म्हणून नोंद करते. तर असे केल्याने ब्रिटिश नागरिक होणार आहेत का? असा सवालही न्यायाधीशांनी विचारला.
राहुल गांधी यांच्या भारतीय नागरिकत्वावर प्रश्न उपस्थित करणारी याचिका हिंदू फ्रंटचे जयभगवान गोपाळ आणि हिंदू महासभेचे चंद्रप्रकाश कौशिक यांनी दाखल केली होती. राहुल गांधींनी ब्रिटिश नागरिकत्व घेतल्याचा आरोप याचिकाकर्त्यांनी लावला होता. यामुळे राहुल गांधींना निवडणूक लढवण्याची परवानगी देऊ नये तसेच त्यांचे नाव मतदार यादीतूनही वगळण्याची मागणी याचिकाकर्त्यांनी न्यायालयात केली होती.