मुंबई : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र तयार झाल्यामुळे देशभरात मुसळधार पावसाने हजेरी लावली. यामुळे मान्सूनच्या परतीच्या प्रवासात अडथळा आला होता. पण आता तो दूर झाला असून मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. 22 आणि 23 ऑक्टोबरला राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह हलका ते मुसळधार स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे.
भारतीय हवामान खात्याने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, देशातील अनेक राज्यांमध्ये आज वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातही कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात पाऊस हजेरी लावेल. किनारपट्टी भागातही मुसळधार पाऊस कोसळेल असं हवामान खात्याने म्हटलं आहे. खरंतर, मागच्या महिन्यापासून सलग 3 वेळा बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले होते. त्यामुळे महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली.