मुंबई-पुणे महामार्गावर आयशर पलटल्याने ५ दुचाकीस्वारांचा मृत्यू

0

पुणे: मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. महामार्गावरून एक्स्प्रेस वे कडे जाणाऱ्या अंडा पॉइंटनजीक आयशर ट्रक तीन बाइक्सवर पलटी झाल्याने ५ दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला आहे. तर एक जण सुखरुप बचावला आहे. चालकाचं नियंत्रण सुटल्याने टेम्पो पलटी झाला आणि त्याचवेळी तो लघुशंकेसाठी थांबलेल्या दुचाकीस्वारांच्या अंगावर पडला आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.

अपघातातील सर्व प्रवासी हे तळेगाव एमआयडीसीमध्ये काम करणारे होते. तीन मोटारसायकल घेऊन ते अलिबागला फिरण्यासाठी गेले होते. तिथून परतत असताना खोपोलीजवळच्या बोर घाटातील अंडा पॉइंट येथे लघवीला थांबले होते. त्याचवेळी पुण्याकडून येणारा आयशर ट्रक (क्र. MH 46 BB 1830) उलटून या तीन मोटारसायकवर आदळला. त्यात चौघे जागीच ठार झाले. तर, एकाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. अपघाताच्या वेळी बालाजी हरिसचंद्र भंडारे (३५) हा गृहस्थ लघवीसाठी बाजूला गेल्यानं बचावला. अपघातग्रस्त मोटारसायकलचे क्रमांक अनुक्रमे MH 14 CV 0243, MH 14 FK 4097 आणि MH 14 FH 5793 असे आहेत. अपघातातील सर्व मृत लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील वंजारवाडीचे आहेत. नोकरीच्या निमित्तानं ते तळेगावातील वराळे फाटा इथं राहत होते.

अपघाताची माहिती मिळताच बोरघाट महामार्ग पोलीस अधिकारी, कर्मचारी, खोपोली पोलीस ठाण्याचे पोलीस, आयआरबीचं देवदूत पथक घटनास्थळी धावलं. त्यांनी अपघातग्रस्तांना ट्रकच्या खालून काढून खोपोली नगरपालिकेच्या दवाखान्यात दाखल केले. मात्र, त्यापैकी चौघांचा आधीच मृत्यू झाला होता. तर, एकाचा रुग्णालयात मृत्यू झाला. अपघातानंतर काही काळ विस्कळीत झालेली महामार्गावरील वाहतूक पुन्हा सुरळीत सुरू झाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.