माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपुरातील घरावर ईडीची छापेमारी

0

नागपूर : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपूर येथील घरी सक्त ईडीने (ED) छापे टाकले आहेत. आज सकाळी पोलिसांच्या फौजफाट्यासह ही कारवाई करण्यात आली. यापूर्वी सीबीआयने अनिल देशमुख यांच्या घरावर छापा टाकला होता. त्यानंतर आता ईडीने नागपुरातील घरी छापेमारी केली आहे.  या कारवाईमुळे देशमुख यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

अनिल देशमुख यांच्यावर वसुली आदेशाचा गंभीर आरोप परमबीर सिंह यांनी केला होता. त्यानंतर मुंबई हायकोर्टाच्या आदेशानुसार सीबीआयने गुन्हा दाखल केला होता. या गुन्हाच्या अनुषंगाने ईसीआयर दाखल करत ईडीने तपास सुरु केला होता. ईडीने आज सकाळी (शुक्रवारी) पावणे आठच्या सुमारास देशमुखांच्या नागपुरातील घरी छापेमारी केली.

यावेळी पोलिसांचा प्रचंड ताफा ईडी अधिकाऱ्यांसोबत होता. १६ जूनला ईडीच्या तीन पथकांनी दोन सीए व एका कोळसा व्यापाऱ्याच्या घरी छापे टाकले होते. या छाप्यानंतर लवकरच देशमुख यांच्याकडेही ईडीचे अधिकारी झाडाझडती घेण्याची शक्यता बळावली होती. त्या अनुषंगानेच ही कारवाई आहे.

काय आहे प्रकरण?

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून गंभीर आरोप केले होते. त्या पत्रानुसार निलंबित सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे हे क्राईम इंटिलिजन्सचं यूनिट हेड करत होते. गेल्या काही महिन्यात गृहमंत्री अनिल देशमुखांना कित्येक वेळेस वाझेंना त्यांच्या ज्ञानेश्वर या निवासस्थानी बोलवलं आणि दर महिन्याला 100 कोटी रुपये जमा करायला सांगितलं. देशमुख वाझेंना म्हणाले की, मुंबईत 1750 बार आणि रेस्टॉरंट आहेत आणि त्यातल्या प्रत्येकाकडून 2 ते 3 लाख रुपये कलेक्ट केले तरीसुद्धा महिन्याला 40 ते 50 कोटी रुपये सहज उपलब्ध होतील. राहिलेली इतर रक्कम इतर मार्गांनी जमा करता येईल. देशमुख हे पोलीस अधिकाऱ्यांना त्यांच्या निवसस्थानी बोलवायचे. पोलिसांना ते सातत्याने सूचना द्यायचे. मला किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांना अंधारात देऊन देशमुख हे पोलीस अधिकाऱ्यांना त्यांच्या बंगल्यावर बोलवायचे आणि पैसे गोळा करण्यासाठी टार्गेट द्यायचे. टार्गेटनुससार ते पोलीस अधिकाऱ्यांना कार्यालयीन कामकाजात तसेच आर्थिक व्यवहारात सल्ला आणि निर्देश द्यायचे. पैसे गोळा करण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांचा ते उपयोग करायचे. त्यांचे हे भ्रष्ट आचरण अनेक पोलीस अधिकाऱ्यांच्या नजरेस आले होते, आदी आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी देशमुखांवर केले होते. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पत्रं लिहून हे आरोप केले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.