महावितरण अधिकारी, कर्मचाऱ्यांनी वैयक्तिक खुन्नस काढण्यासाठी रचला डाव

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

शहरातील सिंधी कॉलनी परिसरात किशोर पोपटानी यांनी मारहाण केल्याचा आरोप करीत महावितरण अधिकारी, कर्मचाऱ्यांनी गुन्हा दाखल केला आहे. मुळात हे संपूर्ण प्रकरण जुन्या प्रकरणातील खुन्नस काढण्यासाठी रचण्यात आले आहे. घरात ५ व्यक्ती घुसल्या आणि एका महिलेचा हात पकडल्याने स्वाभाविकपणे माझे भाऊ किशोर पोपटानी यांनी विरोध केला असता त्या कर्मचाऱ्यांनी त्यांनाच धक्काबुक्की केली. स्वतःच्या बचावासाठी त्यांनी हातात कुऱ्हाड घेतली आणि नेमके त्याच क्षणांचे चित्रीकरण करण्यात आले. महावितरण कर्मचाऱ्याने मोबाईलवर धमकी दिल्यानंतर हा सर्व प्रकार सप्टेंबरमध्ये सुरु झाला होता. महिलेचा विनयभंग झाल्याची तक्रार देखील पोलिसांनी नोंदवून घेतली नाही. पोलीस अधिक्षकांनी फोन केल्यावर एमआयडीसी पोलिसांनी एक अर्ज स्विकारला. महावितरण अधिकारी ४५ दिवसांपासून बील बाकी असल्याचे सांगत असून ते पूर्णतः खोटे आहे. महावितरण अधिकाऱ्यांनी हा एक डाव रचला असून आमच्या कुटुंबाला अडकविण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप गोपाल पोपटानी यांनी केला आहे.

महावितरण कर्मचारी व वीज ग्राहक यांच्यात झालेल्या वादा विषयी महत्वपूर्ण खुलासा…

थेट लाईव्ह….👇

https://fb.watch/a6JZ-g-vuV/

पत्रकार परिषदेत गोपाल पोपटानी यांनी सांगितले कि, सिंधी कॉलनी परिसरात राहणारे आमचे मोठे भाऊ किशोर पोपटानी यांनी वीज बिल वसुलीसाठी आलेल्या महावितरण अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर हल्ला केला असा आरोप करीत त्यांच्यावर एमआयडीसी पोलिसात महावितरण अभियंता जयेश तिवारी यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुळात या प्रकरणाची व्याप्ती आणि दाखविण्यात आलेला संपूर्ण प्रकार हा चुकीचा आहे. सप्टेंबर २०२१ मध्ये माझ्या घराच्या वीजबिल थकबाकीवरून हा वाद सुरु झाला होता.

आजपर्यंतचा संपूर्ण घटनाक्रम :

१७ सप्टेंबर २०२१ : वायरमन राजेश वंजारी याने फोन करून धमकी दिली. अभियंता जयेश तिवारी यांना कळविले होते.

५ ऑक्टोबर २०२१ : टीएम नगरमध्ये सकाळी ७-८ वाजता स्पॉट व्हेरिफिकेशन करून वीज चोरीचा आरोप केला. मीटर सील आणि रिप्लेस केले.

१३ ऑक्टोबर २०२१ : महावितरणने ६ हजार कंपाउंडिंग चार्जेस, ७८ हजार १४० रुपयांचे वीज चोरीचे बील दिले.

२५ ऑक्टोबर २०२१ : लेखी अर्ज दिला आणि बिलाबाबत विचारणा केली.

२९ ऑक्टोबर २०२१ : महावितरणविरोधात न्यायालयात दावा दाखल केला.

१९ नोव्हेंबर २०२१ : महावितरणने वीज पुरवठा काढून घेतला. न्यायायालयात दावा प्रलंबित असल्याचे कळविले होते.

२५ नोव्हेंबर २०२१ : न्यायालयाच्या आदेशानुसार महावितरणला ५० हजार ऑनलाईन अदा केला आणि ३४ हजार १४० रुपयांची बँक गॅरंटी दिली.

२३ डिसेंबर २०२१ : किशोर टिकमदास पोपटानी यांच्या २०८ सिंधी कॉलनी, जळगाव या निवासस्थानी गेले आणि वीज बिल वसुलीची मागणी केली. घरी जाण्याअगोदर त्यांनी विद्युत पुरवठा खंडित केला.

किशोर पोपटानी यांच्या पत्नीने सांगितले कि, घटनेच्या दिवशी महावितरणचे अधिकारी आणि कर्मचारी असे ५ लोक आमच्या घरी आले होते. तुमच्याकडे बिल बाकी आहे. भरणा करा अन्यथा वीज पुरवठा खंडित करू अशी धमकी त्यांनी दिली. नेमके त्याच वेळी परिसरातील विद्युत पुरवठा देखील खंडित झालेला होता. मी माझ्या पतींना बोलावीत असताना ते लोक थेट घरात शिरले असता मी त्यांना विचारणा केली असता एकाने माझा हात पकडत धक्का देण्याचा प्रयत्न केला. घडलेला प्रकार अनपेक्षित असल्याने स्वाभाविक माझे पती किशोर पोपटानी यांनी त्यांचा विरोध केला.

महावितरण अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी बळाचा वापर करीत माझ्या पतीला ओढत आणि धक्काबुक्की करीत घराबाहेर आणले. स्वतःच्या बचावासाठी त्यांनी जवळच रस्त्यावर असलेली कुऱ्हाड उचलली. कुणालाही इजा पोहचविण्याचा त्यांचा हेतू नव्हता केवळ स्वबचाव आणि समोरील व्यक्तींना घाबरविणे इतकाच त्यांचा प्रयत्न होता. महावितरण कर्मचाऱ्यांनी नेमकी त्याच वेळी मोबाईलमध्ये शूटिंग केली आणि ती अर्धवटपणे बाहेर पोहचवली. माझे पती निर्दोष असून आमच्याकडे ४५ दिवसांपासून देखील वीज बिल थकीत नाही. आम्हाला न्याय देवतेवर आणि पोलिसांवर विश्वास असून आम्ही कायदेशीर बाजूने लढा देणार आहोत, असे त्यांनी सांगितले.

गोपाल पोपटानी यांनी सांगितले कि, माझे घर टीएम नगरमध्ये आहे. सप्टेंबर महिन्यात माझ्या घराचे वीज बिल थकीत असल्याने मला राजेश वंजारी या महावितरण वायरमनने फोन केला होता. वीज बिल भरणा न केल्यास पाहून घेईल अशी धमकी त्याने दिली. संबंधित महावितरण अभियंता जयेश तिवारी यांना कळविले होते. त्यानंतर काही दिवसांनी माझ्या घराचा वीज पुरवठा खंडित करून हजारोंची बिल आकारणी करण्यात आली. महावितरणच्या मनमानी कारभाराविरुद्ध मी न्यायालयात दाद मागितली होती. न्यायालयाच्या आदेशाने निश्चित रक्कम देखील मी भरणा केली. संबंधीत संपूर्ण प्रकाराबाबत मी महावितरण अधिकाऱ्यांना वेळोवेळी व्हाट्सअँपद्वारे देखील सूचित केले होते आणि त्यांनी देखील मला माझे मेसेज वाचून रिप्लाय दिलेला आहे. महावितरण विरोधात न्यायालयात दावा दाखल केल्याने त्या विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी एक कुटील डाव रचला.

माझे भाऊ किशोर पोपटानी यांच्या सिंधी कॉलनीतील घरी जाऊन त्यांना त्रास देत अडकविण्याचा हा डाव होता. घटनेच्या दिवशी म्हणजेच दि.२३ डिसेंबर रोजी सर्वप्रथम परिसरातील सर्व वीजपुरवठा खंडित करण्यात आला, जेणेकरून सार्वजनिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कोणताही प्रकार कैद होणार नाही. महावितरण अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी माझ्या वाहिनीचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केल्याने हा प्रकार घडला. माझ्या स्व.वडिलांच्या नावे आमचे वीज मीटर असून त्याचे दि.७ डिसेंबर रोजी भरणा करायचे १३९० रुपये बाकी असलेले बील फक्त आमच्याकडे थकीत होते. त्या बिलाची आकारणी आणि बजावणी १७ नोव्हेंबर रोजी करण्यात आली होती. महावितरणच्याच बिलावरील तारीख गृहीत धरली तरीही आमचे बिल थकीत होऊन ४५ दिवस पूर्ण झालेला नाही. असे असताना देखील ते कारवाईसाठी आले यावरूनच सिद्ध होते कि हा संपूर्ण डाव रचलेला आहे.

न्यायदेवतेवर विश्वास, संबंधित निलंबित होत नाही तोवर लढा सुरूच

घटनेनंतर माझ्या वाहिनी तक्रार देण्यासाठी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गेल्या होत्या परंतु त्यांनी आमची तक्रार घेतली नाही. सदर बाब मी पोलीस अधिक्षकांना फोनवर सांगितली असता त्यांच्या सूचनेनुसार एमआयडीसी पोलिसांनी आमचा तक्रार अर्ज स्वीकारला. आम्हाला आजही पोलीस प्रशासनावर आणि न्यायदेवतेवर विश्वास आहे. माझ्या कुटुंबियांना अडकविण्यासाठी डाव रचणाऱ्या सर्वांची निष्पक्ष चौकशीकामी पोलीस, महावितरण अधिकारी आणि इतर व्यक्तींची समिती नेमावी अशी आमची मागणी आहे. माझ्या कुटुंबियांना अडकविण्याचा प्रयत्न करणारे महावितरण अधिकारी धीरज बारापत्रे, अभियंता जयेश तिवारी, कर्मचारी राजेश वंजारी, योगेश शेषराव जाधव, नमो मधुकर सोनकांबळे, आत्माराम धना लोंढे, गणेश नन्नवरे, भुवनेश पवार यांच्यावर कारवाई होऊन त्यांचे निलंबन होणार नाही तोवर आमचा लढा सुरूच राहणार आहे. माझ्याकडे असलेल्या सर्व पुराव्यानिशी आम्ही लढा देणार असून वेळ पडल्यास आम्ही उपोषणाला देखील बसू, असे गोपाल पोपटानी यांनी सांगितले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.