मुंबई : महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. वाढती कोरोना रुग्णांची संख्या पाहता राज्य सरकारनं कडक निर्बंध लादले आहेत. मात्र तरीही रुग्णसंख्या कमी होण्याचं नाव घेत नाहीय. राज्य सरकारनं आता बाहेरील राज्यातून येणाऱ्या प्रवाशांवर विशेष लक्ष देण्यासाठी नवा निर्णय घेतला आहे.
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सहा राज्यांना कोविड संवेदनशील राज्य म्हणून घोषित करण्यात आलं आहे. या सहा राज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांना कोरोना चाचणीचा रिपोर्ट निगेटिव्ह असणे बंधनकारक असणार आहे. तसेच लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये कोविड संदर्भातील नियमाचं पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
रेल्वेच्या लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी नियमावली
नुकतंच राज्य सरकारकडून रेल्वेच्या लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी ब्रेक द चैन अंतर्गत नियमावली तयार करण्यात आली आहे. त्यानुसार केरळ, गोवा, राजस्थान, गुजरात, दिल्ली आणि एनसीआर, उत्तराखंड या सहा राज्यांना कोव्हिड संवेदनशील राज्य म्हणून घोषित करण्यात आलं आहे. यानुसार या सहा राज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांना 48 तास आधी कोरोना चाचणी अनिर्वाय असणार आहे. तसेच या कोव्हिड चाचणीचा रिपोर्ट निगेटिव्ह असणाऱ्यांना महाराष्ट्रात प्रवेश दिला जाणार आहे, असे यात म्हटलं आहे.
कोविड संदर्भातील सर्व नियमाचं पालन करण्याच्या सूचना
तसेच या सहा राज्यातून केवळ आरक्षित असलेल्या प्रवाशांना गाड्यांमध्ये प्रवेश देण्यात येणार आहे. तसेच प्रवास करणाऱ्या प्रवाशाला कोरोनासदृश कोणतीही लक्षणं आहे की नाही, याची खात्री करुनच परवानगी दिली जाणार आहे. त्याशिवाय रेल्वे प्रशासनाने या राज्यातून येणाऱ्या आणि जाणाऱ्या रेल्वे गाड्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाला द्यावी, असेही यात नमूद करण्यात आले आहे.तसेच अनेकदा लांब पल्ल्यांच्या गाड्यांमध्ये कोविड संदर्भातील सर्व नियमाचं पालन करावं, अशी सूचनाही यावेळी देण्यात आली आहे.
राज्यातील कोरोनाबाधितांचा चढता आलेख कायम
राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांचा चढता आलेख कायम आहे. काल राज्यात 68 हजार 631 इतक्या सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली. यामुळे राज्यातील एकूण अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 6 लाख 70 हजार 388 वर गेली आहे. तर दुसरीकडे राज्यातील कोरोनामृत्यूचे प्रमाण वाढत आहे.