नवी दिल्ली : “महाभारताचं युद्ध १८ दिवसांत जिंकलं गेलं होतं आता आपल्याला २१ दिवसांत करोनाविरोधातील युद्ध जिंकायचं आहे,” पंतप्रधान मोदी यांनी आज (बुधवार) पहिल्यांदाच आपला मतदारसंघ असलेल्या वाराणसीतील जनतेशी त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सींगद्वारे संवाद साधला.
मोदी म्हणाले, “महाभारताचे युद्ध १८ दिवसांत जिंकले गेले होते. आज करोनाविरोधातील युद्ध संपूर्ण देशात लढले जात आहे. यासाठी २१ दिवस लागणार आहेत. आपला प्रयत्न आहे की हे युद्ध आपण २१ दिवसांतच जिंकायचं आहे. महाभारताच्या युद्धात भगवान श्रीकृष्ण महारथी, सारथी होते. आज १३० कोटी महारथींच्या जोरावर आपल्याला करोनाविरोधातील ही लढाई जिंकायची आहे. यामध्ये काशीवासियांची देखील मोठी भूमिका असेल.”
“करोनाच्या आजाराचा फैलाव पाहता त्याच्याशी लढण्यासाठी देशभरात व्यापक तयाऱ्या केल्या जात आहेत. सर्वांना या काळात घरांमध्ये राहणं गरजेचं आहे. हाच या आजापासून वाचण्याचा चांगला उपाय आहे. करोनाच्या संक्रमितांची जगात १ लाखांपेक्षा अधिक संख्या झाली आहे. भारतात डझनभर लोक करोनाच्या तावडीतून बाहेर पडले आहेत,” असेही मोदी यावेळी म्हणाले.